Onion farmers News: ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या केंद्र सरकारच्या यंत्रणांनी दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेला कांदा बाजारात आणला आहे. कांदा दर घसरलेले असताना हा निर्णय झाला आहे. त्याचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या कांदा उत्पादकांची ओरड सुरू आहे. यासंदर्भात राज्य शासनाने ही कांदा विक्री थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. आता यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
छगन भुजबळ यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ संस्थांनी बफर स्टॉक देशाच्या आमदाबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकत्ता बाजारात विक्रीला आणला आहे. कांद्याची विक्री २४ रुपये प्रति किलो होत आहे.
बफर स्टॉक अशावेळी बाजारात आला आहे, जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शासनाच्या धोरणामुळे गेले दोन महिने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. कांदा दर घसरल्याने राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
कांदा निर्यात बंदी आणि आयात निर्यात शुल्क यावर केंद्र शासनाने शेतकऱ्यांना फटका बसेल असे धोरण घेतले आहे. आयात शुल्क शून्य केल्याने प्रदेशात भारतीय कांद्याची मागणी घटली. त्यामुळे कांदा निर्यात प्रभावित झाली आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत शेतकऱ्यांचा कांदा दहा ते अकरा रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कांदा दर सातत्याने घसरत आहे. त्या स्थितीत नाफेड आणि एनसीसीएफ संस्थेचा कांदा बाजारात आल्याने दर आणखी घसरण्याचा धोका आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची या विषयावर चर्चा केली. लासलगाव, मनमाड आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा केली जाणार आहे. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.