Chief Minister Eknath Shinde and Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : 'यूटी' आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका; अन्यथा 'पाटणकर' काढा घ्यावा लागेल : मुख्यमंत्री शिंदेंचा थेट इशारा

Eknath Shinde News : जळगावमध्ये 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

कैलास शिंदे

Jalgaon News : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे मला म्हणाले, हाऊ इज 'यूटी' मी 'व्हाय' (यूटी म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे) ते दरवर्षी लंडनला येतात, मोठमोठ्या प्रॉपर्ट्या घेतात, मोकळी हवा खातात. मी तुम्हाला सर्व माहिती देतो, लंडनला या मी तुम्हाला सगळं सांगतो, त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नये; अन्यथा 'पाटणकर' काढा घ्यायची वेळ येईल, असा सणसणीत टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

पाचोरा येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील त्यांचे सरकार गेलं आहे. मात्र, ते मानण्यास तयार नाहीत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे ते काहीही बोलू लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही ते कोणत्याही भाषेत बोलू लागले आहेत.

माझ्यावर टीका करताना मी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांना भेटलो. त्यांच्याशी कोणत्या भाषेत बोललो, मी त्यांची भेट घेतली परंतु सांगणार नव्हतो. मात्र, आता सांगतो ऋषी सुनक मला म्हणाले, हाऊ इज 'यूटी' मी म्हटले व्हाय ? त्यांनी सांगितले, दरवर्षी लंडनला येतात तेथे मोठ्या प्रॉपर्ट्या घेतात, मोकळी हवा खातात. तुम्ही लंडनला या मी तुम्हाला सर्व माहिती देतो. आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नये; अन्यथा त्यांना 'पाटणकर' काढा घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी 'यूटी' नावाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव घेता दिला.

ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, सत्ता असताना ते घरी बसले. आम्ही आता जनतेच्या दारी जात आहोत, तर ते आमच्यावर टीका करीत आहेत. त्यांचा पोटशूळ होत आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर उपाय म्हणून 'डॉक्टर आपल्या दारी' ही योजना लवकरच राबविणार आहोत. अडीच वर्षे ते थांबले होते, त्यांनी काहीही केले नाही. मात्र, आमची सत्ता आल्यावर आम्ही अनेक धाडसी योजना राबवित आहोत, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी विविध योजना राबवित आहोत.

महिलांसाठी आम्ही एसटीचे तिकीट अर्धे केले आहे. तसेच आता महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांसाठीही आम्ही योजना राबवित आहोत. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे हे सरकार आज शेतकऱ्यांनाही आपलेसे वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली देश विकासाकडे जात आहे. त्यानुसार राज्यही आज विकासाकडे जात आहे. त्यामुळेच अनेकांना पोटात दुखू लागले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT