Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde : माजी आमदारांनी विलासरावांचा किस्सा सांगितला अन् मुख्यमंत्र्यांनी फोन फिरवला..

सरकारनामा ब्युरो

Eknath Shinde :'खिशाला लावलेला पेन हेच मंत्रालय' असल्याचं विधान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्याचा प्रचिती शनिवारी नंदुरबारमध्ये आली. कारण मुख्यमंत्र्यांनी एका फोनवर शहरासाठी सात कोटींचा रखडलेला निधी मंजूर केला आहे. (Eknath Shinde Nandurbar Visit news)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नंदूरबारचे पालकमंत्री विजयकुमार गावित, भाजप खासदार हिना गावित, खनिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. शिंदे यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरातील कार्यक्रमात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एक किस्सा सांगितला. "दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकदा नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी तीन दिवसांत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता," असे रघुवंशी यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले. नंदुरबार जिल्ह्यासाठी निधी रखडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानानंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खिशातील मोबाईल काढून मंत्रालयात अधिकाऱ्यांना कॉल केला आणि नंदूरबार शहराच्या विकासासाठी रखडलेल्या सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आदेश दिले.

एकनाथ शिंदे म्हणाले,"शेतकरी संकटात होते त्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. आतापर्यंत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत दिली जात होती. मात्र, आपल्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पटीने मदत करण्याचा निर्णय घेतला. दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरचा निर्णय घेण्यात आला,"

"शेतकऱ्यांच्या नियमाने मदत जर केली असती तर 1500 कोटी रुपये लागले असते मात्र, आम्ही 6000 कोटी रुपये वाटलेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला.आता काही जण बांधावर जातायेत त्या सर्वांना मी कामाला लावले," अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे पिता-पुत्रांना टोला लगावला आहे.

शिंदे म्हणाले, "2019 लाच हे सरकार यायला हवे होते. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यातील विकासकामे मंदावली होती, त्याला गती देण्याचे काम युतीचे सरकार करत आहे, हे सर्वसामान्याचे सरकार असून, लोकांच्या भावना पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत, आम्ही शेतकरी हाच केंद्रबींदू माणून काम करत आहोत. आतापर्यंत आम्ही नुकसानग्रस्तांना 6 हजार कोटींची मदत दिली."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT