Uddhav Thakre & Amsha Padvi
Uddhav Thakre & Amsha Padvi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपने उपेक्षा केलेल्या आमशा पाडवीचे उध्दव ठाकरेंनी सोने केले!

Sampat Devgire

नाशिक : आमशा फुलजी पाडवी (Amsha Phulji Padvi) हा मुळचा भाजपचा (BJP) कार्यकर्ता. विजय गावितसारखे दिग्गज पक्षात आल्यावर भाजपने त्यांची उपेक्षा केली. या उपेक्षेमुळेच पाडवीने भाजप सोडून शिवबंधन बांधले. इर्षेने दुर्गम भागात शिवसेना (Shivsena) रुजवण्याचा प्रयत्न केला. पक्ष तळागाळात नेला. त्याची कदर करीत उध्दव ठाकरे (Uddhav Thakery) यांनी विधानपरिषदेसाठी त्यांची निवड करीत त्यांचे सोने केले. (Nandurbar`s Amsha Padvi will be shivsena`s MLC)

कोयलीविहीर (अक्कलकुवा) येथील आमशा पाडवी खरा भाजपचा कार्यकर्ता. त्याने अतिशय तडफेने पक्षासाठी काम केले. पक्षाने त्यांना २०१४ मध्ये त्यांना उमेदवारीही दिली, मात्र निवडणुकीत ताकद दिली नाही. त्याआधी ते अक्कलकुवा पंचायत समिती सभापती होते. पुढे विजय गावित व त्यांचे कुटूंब भाजपमध्ये आल्यावर त्यांना पाडवींची राजकीय अडचण वाटू लागली. त्यात पक्षानेही या निष्ठावंत कार्यकर्त्याची उपेक्षा केली. त्यामुळे चार वर्षांपूर्वी त्यांनी शिवबंधन बांधले. ते तीन वर्षांपासून नवापूर- अक्कलकुवा विभागाचे जिल्हाप्रमुख झाले. सध्या ते धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यांनी आदिवासी, दुर्गम भागात शिवसेना रूजविण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेत भाजपने उपेक्षा केलेल्या या नेत्याचे शिवसेनेत मात्र सोने झाले.

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून खुद्द उद्धव ठाकरे यांनी श्री. पाडवी या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर केली. राज्यसभेसाठी कोल्हापूरचे संजय पवार आणि त्यानंतर नंदुरबारचे पाडवी यातून शिवसेनेत सामान्यांना मिळालेली संधी चर्चेचा विषय आहे. त्याचा राज्यभरातील कार्यकर्त्यांत सकारात्मक संदेश पोहोचला आहे. उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेनेसाठी एकदीलाने संघटनात्मक काम करणाऱ्याला न्याय मिळाला, अशी भावना कार्यकर्ते बोलून दाखवतात.

उध्दव ठाकरेंनी टाकला विश्वास

आमशा पाडवी गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. शिवसेनेला नंदूरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. कोणतीही साधनं नसतानाही पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचं काम केलं आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण २०१९ च्या निवडणुकीत आमशा पाडवी यांनी ८० हजार ७७७ मते मिळाली होती. त्यांचा १२०० मतांनी निसटता पराभव झाला होता.

नंदूरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून नंदूरबारमधून काँग्रेसची राज्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात होते. त्यामुळे या जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाडवी यांना शिवसेनेने विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेऊन त्यांसना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

सामान्य कार्यकर्त्याला संधी

मी शिवसेनेत सुरुवातीपासून काम करत आहे. त्याची आज कदर झाली. शिवसेना पक्षप्रमुखांनी मला तिकीट दिलं. हे माझं भाग्यच आहे. काल मला शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोन आला. त्यांनी मला फोन करून याबाबतची काल माहिती दिली. आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांनीही मला याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आज मी मुंबईत आलो आहे. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असं पाडवी यांनी सांगितलं.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT