Congress Nashik Agitation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics: काँग्रेस निघाली दुर्बीण घेऊन, स्मार्ट नाशिक शोधायला, शहरात अनोखे आंदोलन!

Sampat Devgire

Nashik Congress News: गेले काही दिवस नाशिककर नागरी समस्यांनी त्रस्त आहेत. नादुरुस्त रस्ते आणि खड्डे यामुळे रोज अपघात होत आहेत. यावर भाजप आमदारांनी प्रशासनाला अल्टीमेटम दिला होता. सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन केल्याने राजकीय नेते आक्रमक आहेत.

नाशिक महापालिका कोणाला उत्तरदायी आहे की नाही, अशी शंका यावी अशी आजची स्थिती आहे. राज्य सरकारचे महापालिकेवर नियंत्रण आहे. मात्र प्रशासक वेगळ्याच कामांमध्ये रस घेतात, अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील राजकारण तापू लागले आहे.

शहरातील नागरिकांमध्ये आपल्याला सध्या वाऱ्यावर सोडल्यासारखी भावना आहे. गेल्या आठवड्याभरात शहरांमध्ये असंख्य अपघात झाले आहेत. अनेकांना प्राण गमवावे लागले. कोट्यावधी रुपयांचा होणारा खर्च कुठे जातो आहे? कशावर होतो आहे? अशी गंभीर स्थिती निर्माण झाल्याने काँग्रेस पक्षाने यावर अनोखे आंदोलन हाती घेतले आहे.

या संदर्भात काँग्रेसने उपरोधिक आंदोलन सुरू केले आहे. शहर काँग्रेस सेवा दलातर्फे चार फुटाची दुर्बिन घेऊन नाशिक स्मार्ट सिटी कुठे आहे? याचा शोध सुरू केला आहे. यामध्ये शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नाशिक महापालिका प्रशासक अशोक करंजकर यांना याबाबत जाब विचारण्यात आला आहे. महापालिका प्रशासन बेदरकार आणि निर्ढावले आहे. त्यांना शहरातील नागरिकांची काळजी नाही. शहराची मूलभूत व्यवस्था आणि प्राथमिक सुविधा देखील सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडण्यात ते अयशस्वी झाले आहेत. या आंदोलनाने शहरातील नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.

त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गंभीर कारवाई करावी. तसे झाले तरच प्रशासनावर वचक निर्माण होईल, अशी मागणी यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड आणि वसंत ठाकूर यांनी केली.

महापालिकेच्या कारभाराविरुद्ध सध्या सर्वच नागरिक त्रस्त आहेत. शहरात स्वच्छतेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत शहराचं क्रमांक तेविसावा आहे. मोठा खर्च करून यांत्रिक झाडू खरेदी करण्यात आले आहे. ते धुळखात पडून आहेत.

नमो गोदा प्रकल्पावर कोट्यावधी रुपये खर्च झाले. मात्र गोदावरीची स्वच्छता होऊ शकलेली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत नाट्यगृह आणि उद्याने विकसित झाल्याचा दावा केला जातो. मात्र ती सर्व बंद आहेत. शिक्षण मंडळाच्या बहुतांशी इमारती धुळखात पडल्या आहेत. नॅनो मेट्रो सुरू करण्याची घोषणा झाली. मात्र त्याचा मागमुसही नाही.

----

शहरातील सांडपाणी सध्या थेट गोदावरी नदीत सोडले जाते. विजेच्या वाहिन्या भूमिगत करण्याचे काम कागदावरच आहे. या सर्व स्थितीला राज्यातील महायुती सरकार आणि महापालिकेचे प्रशासक जबाबदार आहेत. याबाबत तातडीने सुधारणा न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला.

स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली सुरू असलेला महापालिकेतील प्रचंड मोठा भ्रष्टाचार तातडीने थांबवावा, अशी मागणी यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांनी केली. यावेळी भालचंद्र पाटील, माजी नगरसेविका हेमलता पाटील, माजी नगरसेवक राहुल दिवे, वत्सलाताई खैरे, हनीफ बशीर, संतोष जाधव, लक्ष्मण धोत्रे, उद्धव पवार, स्वाती जाधव, संदीप शर्मा असे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.

यापूर्वी शहरातील भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिकले आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांनी महापालिका अधिकाऱ्याची बैठक घेऊन त्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम केव्हाच संपला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे नाशिक रोडला जेलरोड येथे मोठे आंदोलन झाले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील महापालिकेला पत्र लिहून रस्ते दुरुस्ती आणि प्राथमिक सुविधांविषयी कामकाजात सुधारणा करण्याचा इशारा दिला होता. जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या आंदोलनानंतर काँग्रेसने चार फूट लांबीची दुर्बीण घेऊन उपरोधिक आंदोलन केले आहे. त्याचा तरी महापालिका प्रशासनावर काही फरक पडतो का याची आता उत्सुकता आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT