Devendra Phadanvis & Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याने भाजप नेते धास्तावले?

Sampat Devgire

Mahayuti News: विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीत काय होते, याची चिंता भाजप नेत्यांना सतावत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील आमदारांशी नुकतीच मुंबईत भाजप नेत्यांनी चर्चा केली.

भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदारांची यावेळी चर्चा झाली. पक्ष नेतृत्वाला निवडणुकीची चिंता असली तरीही आमदार मात्र निश्चिंत आहेत.

लोकसभा निवडणुक निकालाचा कोणताही परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार नाही. या निवडणुका स्थानिक प्रश्नांवर होतील. मतदारसंघात झालेल्या विकास कामांमुळे भाजपला शंभर टक्के यश मिळेल, असा दावा यावेळी आमदारांनी केला

भाजपचे आमदार निश्चित असले, तरीही ग्राउंड रियालिटी काही वेगळेच संकेत देत आहेत. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांनी जागा वाटपाबाबत सावध पावले टाकली आहेत. याबाबतचे धोरणही निश्चित झालेले नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात काही मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते, असा सूचक संदेश दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षावर दबाव निर्माण केला आहे. अशा स्थितीत भाजपच्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी पक्षाला प्रयत्न करावे लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर होऊ नये, यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली. जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धास्ती महायुतीने घेतली आहे. जरांगे पाटील यांनी भाजपला टार्गेट केले आहे.

जरांगे पाटील यांचे आंदोलन व भूमिकेचा परिणाम राज्यातील कोणत्या भागात होईल, याची चाचणी सुरू आहे. यावेळी बहुतांश आमदारांनी मराठवाडा वगळता अन्य भागात मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम होणार नाही, असा दावा केला आहे. स्थानिक प्रश्नांवरच निवडणुका होतील, असा विश्वास या आमदारांना वाटतो.

भाजपच्या आढावा बैठकीत राज्याचे महसूल मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनीही चर्चेत भाग घेतला. आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार दिलीप बोरसे हे नाशिकचे आमदार उपस्थित होते

विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी एका महिनाभरात मतदार संघाचे प्रलंबित प्रश्न राज्य शासनाकडून मार्गी लागतील. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित करून भाजप विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT