Ahilyanagar news : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
या प्रकरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप करत धीरजसिंहवरील हल्ल्याची तुलना जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी केली आहे. मात्र, धीरजसिंह यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला झाला, याबाबत पोलिस तपासातून अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.
आमदार पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दावा केला की, धीरजसिंह याच्या कपाळावर भगवा टिळा असल्याने मुकुंदनगर परिसरात त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पडखळकरांनी हा दावा करताच या घटनेला धार्मिक रंग देणारे वरील वक्तव्य केले. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून हल्ला केल्याचा संदर्भ देत, त्याच धर्तीवर धीरजसिंह याच्यावर हल्ला झाल्याचे पडळकर यांनी म्हटले. मात्र, हा दावा पडळकरांचा असून त्याला पोलिसांकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
मुकुंदनगर परिसरात धीरजसिंह याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी (Police) पाच जणांना अटक केल्याची माहिती आहे. हल्ल्याचे नेमके कारण, त्यामागील पार्श्वभूमी आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. धीरजसिंह याच्या मृत्यूनंतर अहिल्यानगर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी घटनेच्या निषेधार्थ शहर बंदची हाक दिली असून, सलग दोन दिवस शहरातील व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला आहे.
धीरजसिंह याच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना ज्या ठिकाणी पतीवर हल्ला झाला, त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची भूमिका मांडली आहे. दरम्यान, धीरजसिंह याच्या मृतदेहाची छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणी सुरू आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह अहिल्यानगरमध्ये आणला जाण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगरमध्ये दाखल झालेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुकुंदनगर परिसरातील सामाजिक आणि लोकसंख्यात्मक परिस्थितीवरही भाष्य केले. हा परिसर पूर्वी हिंदूबहुल होता, मात्र आता हिंदू अल्पसंख्याक झाल्याचा दावा त्यांनी केला. या भागात हिंदूंवर दबाव आणणे, त्यांना परिसरातून हाकलून लावणे किंवा काम करू न देणे, अतिक्रमण, धार्मिक स्थळे आणि मंदिरांबाबत वाद निर्माण करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला.
या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असली तरी मुख्य संशयित कोण आहे, त्याला कधी अटक होणार आणि या हल्ल्यामागील पाळेमुळे कुठपर्यंत आहेत, याचा तपास करण्याची गरज असल्याचे पडळकर यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी मुलींना लक्ष्य करणे, कथित ‘लव्ह जिहाद’, सरकारी जागांवरील अतिक्रमण आणि धार्मिक स्थळांशी संबंधित वाद यांसारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला. या आरोपांचा धीरजसिंह हल्ल्याशी थेट संबंध असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाचा संदर्भ देत पडळकर यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. छत्रपती संभाजीनगरमधील कारवाईचा दाखला देत धीरजसिंह हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवरही बुलडोझर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.