Ahilyanagar bandh : अहिल्यानगर महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी यांच्या हत्या प्रकरणावरून अहिल्यानगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप समोर आलेले नाहीत, असा दावा करत अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
धीरजसिंह याच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असून, त्याचाच भाग म्हणून मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात नेऊन ठेवणार असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
आमदार जगताप यांच्या या भूमिकेमुळे पोलिस (Police) प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शहरातील संभाव्य तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले असून, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत मैदानात उतरल्याचे सांगण्यात येत आहे.
धीरजसिंह राजपूत यांच्या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष हल्लेखोरांव्यतिरिक्त या घटनेमागे अन्य व्यक्तींचा सहभाग असल्याचा दावा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केला आहे. “धीरजसिंह राजपूत यांच्या हत्येतील मास्टरमाईंड वेगळे आहेत. ते समोर आले पाहिजेत आणि त्यांना अटक झाली पाहिजे. कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे,” असे जगताप यांनी म्हटले.
धीरजसिंह यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी काही हालचाली झाल्या होत्या. त्या हालचालींमागे कोण होते, याचा तपास झाला पाहिजे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाहेर असल्याचा आमचा संशय असून, त्याचा उलगडा होणे आवश्यक आहे, असा दावा जगताप यांनी केला.
धीरजसिंह राजपूत हे कर्तव्य बजावण्यासाठी मुकुंदनगर परिसरात गेले होते. तेथे त्यांनी भगवा टिळा लावल्याने वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा दावा आमदार जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केला. मात्र, या दाव्याची अधिकृत तपासातून पुष्टी होणे बाकी आहे. धीरजसिंह यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित असल्याचा पुनरुच्चारही जगताप यांनी केला. “आज एका मुलाबरोबर असा प्रकार झाला आहे. उद्या असे प्रकार वाढू शकतात. ही प्रवृत्ती ठेचण्यासाठी बंदची हाक देण्यात आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
धीरजसिंह राजपूत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रविवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात नेण्याच्या आमदार जगताप यांच्या भूमिकेमुळे आज शहरात पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
धीरजसिंह राजपूत यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक शाळांनी आज शाळा न भरवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन शालेय बस चालक संघटनांनी विद्यार्थ्यांची वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला. रिक्षाचालकांनीही वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थी वाहतुकीवर बंदचा परिणाम जाणवला.
बंदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, धीरजसिंह राजपूत हत्या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार कोण? हल्ला पूर्वनियोजित होता का? आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.