Dr Bharti Pawar & MP Bhaskar Bhagre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Bharati Pawar: भारती पवारांनी सुनावले, "नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये कांद्याला सर्वांत चांगला भाव"

Sampat Devgire

BJP Vs NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी गणेशोत्सवात कांदा विषयावर देखावा केला आहे. हा देखावा आता राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय झाला आहे. या देखाव्यावर त्यांच्या विरोधकांनी टीका केली आहे.

गणेशोत्सव सुरू आहे. यामध्ये दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या घरच्या गणपतीला कांदा या विषयावर देखावा केला आहे. त्यांच्या कन्येने केलेल्या या राजकीय देखाव्यावर आता टीकाही होऊ लागली आहे.

या संदर्भात भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या, कांदा हा आमच्या मतदारसंघातला महत्त्वाचा प्रश्न आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही सातत्याने काम केले. त्यांचे अनेक प्रश्न सोडवले.

कांदा प्रश्न शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्या दृष्टीने आम्ही प्रत्यक्ष काम केले. मात्र हे काम करताना देखावा करायचं राहून गेलं. आम्ही देखावा करायला विसरलो. खासदार भगरे हे मात्र कांदा प्रश्नावर देखावा करीत आहेत.

खासदार भगरे यांनी आतापर्यंत कांदा प्रश्नावर काय काम केले? हे कोणालाच दिसले नाही. या विषयावर देखावा मात्र ते उत्तम करीत आहेत. या देखाव्यातून काय संदेश द्यायचा आहे, हे मला समजले नाही. कांदा प्रश्नावरील हा देखावा अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी याबाबत माझ्याकडे खंत व्यक्त केली. त्यामुळे इच्छा नसतानाही मला हे बोलावे लागत आहे.

डॉ पवार म्हणाल्या, कांदा प्रश्नावर जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही प्रत्यक्ष काम केले. बांगलादेशच्या सीमेवर कांद्याचे ३०० ट्रक अडकून पडले होते. तेव्हा एका फोनवर आम्ही ते ट्रक सोडायला लावले. त्यामुळे कांद्याचा अडकलेला पुरवठा सुरळीत झाला.

सुरुवातीच्या काळात कांदा निर्यात बंदी होती. मी खासदार म्हणून काम सुरू केल्यावर कांदा निर्यात बंदी उठवली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. त्यातून कांद्याचे भाव वाढले. कांदा उत्पादकांना फायदा झाला. हे काम आम्ही केले, मात्र त्याची जाहिरात आणि देखावा कधीही केली नाही.

सध्या कांदा निर्यातबंदी आहे. त्याचा विरोधकांकडून मोठा बाऊ केला जातो. या विषयावर राजकारणही देखील होत आहे. मात्र आज कांद्याला चांगला भाव मिळतो आहे, हे विसरताकामा नये.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असताना कांद्याला चांगला भाव मिळतो आहे. हे विचारात घेतले पाहिजे. विरोधकांनी कांद्याला भाव मिळावा म्हणून काय केले? असा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे? याचे उत्तर विरोधक देऊ शकतील का?.

कांदा उत्पादकांच्या खऱ्या प्रश्नांवर आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम केले. मात्र देखावा करायचे राहून गेले. खासदार भगरे मात्र या विषयावर केवळ देखावा करीत आहेत. त्यांनी काम सुद्धा केले तर, बरे होईल. आम्हाला त्याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खोटा प्रचार केला. आता ते उघडे पडू लागले आहेत. भाजपच्या ४०० पार या घोषणेला त्यांनी राज्यघटना बदलणार, आरक्षण उठविणार ही भीती दाखवून मते मिळविली. मात्र आता काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतः प्रदेशात जाऊन आरक्षण उठविण्याची भलामन करीत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचे खरे रूप लोकांना दिसले आहे. असा दावा, डॉ पवार यांनी केला

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT