Uddhav Thakre & Eknath Shinde
Uddhav Thakre & Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

...तर एकनाथ शिंदेंची आमदारकी रद्द होणार; बंडखोर अडचणीत?

Sampat Devgire

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. मात्र सध्या गुवाहाटीत तळ ठोकलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता विधीमंडळाच्या सभागृहातच मिळू शकते. त्यात अनेक तांत्रीक अडचणी असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे शिंदे यांचा मार्ग खडतर आहे. (In that case Eknath Shinde`s membership could cancel)

शिवसेनेच्या प्रतोदांच्या सहीचे बंडखोर बारा आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे भवितव्य व मार्ग कोणता यावर चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार बहुमतात आहे की नाही याचा फैसला विधीमंडळातच करावा लागेल. त्यात राज्यपालांना कोणतिही भूमिका घेता येत नाही, असे विधीमंडळाचे निवृत्त सचिव अनंत कळसे यांनी आज `साम` वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आमदारांच्या सहीचे एक पत्र पाठविले आहे. त्यानंतर शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना एकनाथ शिंदे यांच्या गटातील बारा सदस्यांना अपात्र ठरविण्याचे पत्र दिले. याबाबत श्री. शिंदे यांनी आम्हाला घाबरवू नका, कायदे आम्हाला माहीत आहेत. यासंदर्भात विधीमंडळाचे निवृत्त सचिव श्री. कळसे यांच्याशी चर्चा झाली.

ते म्हणाले, श्री. शिंदे यांच्या गटाला मान्यता देणे यामध्ये राज्यपालांची भूमिका अतिशय मर्यादीत आहे. ते हस्तक्षेप करू शकणार नाहीत. याबाबत कायदे अतिशय स्पष्ट आहेत. यापूर्वी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सहा आमदारांनी सरकारला पाठींबा काढल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष अरूण गुजराती यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र गुजराती यांचा निर्णय कायम राहिला. त्यामुळे याबाबत एकनाथ शिंदे यांचा मार्ग त्यांना वाटतो तेव्हढा सोपा नाही. कारण त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय श्री. झिरवाळ घेऊ शकतात.

श्री. शिंदे यांचा गट खरी शिवसेना असेल का?. पक्षाचे चिन्ह शिंदे यांना मिळेल का?. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच्या कक्षेतील आहे. त्याबाबत सदस्यसंख्या तपासली जाईल. त्या पक्षाच्या नोंदणीत कोणाला कोणते अधिकार आहेत, घटनेत काय म्हटले आहे, याचे खुप सविस्तर विवेचन व विवरण असते. ते तपासले जाईल. त्यानुसार निवडणूक आयोग निर्णय घेईल.

ते पुढे म्हणाले, याबाबत काँग्रेसमध्ये फूट पडल्याने त्या पक्षाचे चिन्ह बैलजोडी हे गोठविण्यात आले होते. त्यानंतर गाय वासरू हे चिन्ह मिळाले. त्यानंतर पुन्हा फुट पडल्याने इंदिरा गांधी यांना सध्याचे जे हाताचा पंजा हे चिन्ह आहे ते मिळाले होते. ही अतिशय क्लीष्ट व वेळखाऊ प्रक्रीया आहे. त्याला कायदेतज्ञ विविध प्रकारे उत्तरे देऊन मुद्दे सांगू शकतात. त्यामुळे याबाबत काही विधान करणे प्रिमॅच्युअर होईल.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT