CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा समाचार, म्हणाले, विरोधक हे सावत्र भावासारखे!

Sampat Devgire

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या सबंध दौऱ्यात त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील नेते जोडण्याचा देखील त्यांचा प्रयत्न दिसला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. शनिवारी झालेल्या त्यांच्या धुळे दौऱ्यात त्याचा अनुभव सगळ्यांनाच आला. त्या दृष्टीने बेरजेच्या राजकारणावर मुख्यमंत्र्यांचा भर होता.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विरोधी पक्ष आणि त्याचे नेते हे सावत्र भावासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांमुळे त्यांचा जनाधार कमी होऊ लागला आहे, असे सांगितले,

मुख्यमंत्रयांच्या या दौऱ्यात त्यांनी अन्य पक्षातील प्रमुख नेत्यांना शिवसेना शिंदे गटाशी कसे जोडता येईल यावर त्यांनी स्थानिक नेत्यांची चर्चा केली. आगामी निवडणुकीत महायुतीला शंभर टक्के यश मिळेल. सबंध राज्यात महायुती सरकार वरील विश्वास वाढला आहे, असा संदेश त्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रचारावर लक्ष केंद्रित करावे, असा कानमंत्र यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने गेल्या महिनाभरात राज्य शासनाने अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. यामध्ये लाडकी बहीण ही योजना प्रमुख आहे.

लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत दीड कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत त्यांच्यासाठी देखील राज्य शासन अर्ज दाखल करण्याबाबत नियम शिथिल करेल, असे संकेत या दौऱ्यात त्यांनी दिले. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय चित्र बदलले आहे

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती विरोधात सुरू झालेल्या चर्चा या योजनांमुळे थांबल्या. आता जनता महायुतीच्या बाजूने कौल देईल. असा विश्वसा व्यक्त करीत शविसेना शिंदे गटाच्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.

या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या महिन्याभरात अनेक लोकोपयोगी निर्णय झाले आहेत. त्याचा राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे सरकार विषयी सामान्य जनतेत अनुकूल वातावरण आहे, असा दावा त्यांनी केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या आमदारांबरोबरच सर्वच नेत्यांना खुश करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले गेली अनेक वर्ष बंद असलेल्या पांझराकान साखर सुरू करण्यासाठी लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी उपजिल्हा रुग्णालय आणि एकलव्य विद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

आगामी निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, आमदार मंजुळा गावित, आमदार किशोर दराडे, माजी खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांसह विविध नेते या दौऱ्यात सहभागी झाले होते

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT