Panand Farm Road Movement Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Farmers Issue: ... म्हणून शेतकरी 'इथं' करणार आगळंवेगळं पेरू वाटप आंदोलन!

Pradeep Pendhare

Ahmednagar News : सरकार बदलले की, निर्णय बदलले जातात. निर्णय बदलत राहतात. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. शेत रस्त्यांबाबतदेखील हेच झाले. महाराष्ट्रातील शेत रस्त्यांवरील वाद गंभीर होत चाललेत. फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये मोठे वाद निर्माण झालेत. भावाभावांमध्ये वाद पेटले आहेत. यातूनच मोठे अनर्थ घडत आहेत. हे टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ राज्यात सुरू करण्यात आली आहे.

या चळवळीने नगर जिल्हा प्रशासनाला निवेदन देत शिव पाणंद रस्त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. यासाठी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ नगर जिल्हाधिकारी कार्यालयात 18 नोव्हेंबरला पेरू वाटप आंदोलन करणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतीचे तुकडे पडत आहे आणि हे वाढतच चालले आहे. शेतातील कामसाठी मजूर मिळत नाहीत. यांत्रिकीकरण वाढले आहे. हे आता अपरिहार्य झाले आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी यंत्र लागतात. यासाठी दर्जेदार शेतरस्त्यांची गरज असते. त्याचा अभाव राज्यात आहे.

शेतीसाठी बारामाही रस्त्यांची आवश्यकता असते. नगर जिल्हा प्रशासनाकडे शेतरस्त्यांच्या शेकडो प्रकरणे प्रलंबित आहे. मात्र, अनेक ठिकाणच्या या प्रकरणांवर सुनावणी होत नाही. राज्यातील बहुतांशी तहसील कार्यालयांमध्ये हीच स्थिती आहे. या प्रकरणांवर तातडीने सुनावणी होणे गरजेची आहे. याकडे राज्य सरकारचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात 18 नोव्हेंबरला पेरू वाटप आंदोलन महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्यान निकालानुसार 60 दिवसांत शिव पाणंद शेतरस्ता खुला झाला पाहिजे. यासाठी प्रशासनाकडून अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण शुल्क बंद करा, तहसीलसह प्रशासकीय कार्यालयांमध्ये दाखल होत असलेल्या तक्रारींवर उत्तर देणे बंधनकारक करा, शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करा, अशा मागण्या या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यावर कार्यवाहीसाठी शिव पाणंद शेतरस्ता चळवळीने आंदोलन छेडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि प्रशासकीय पातळीवर यासंदर्भातले निवेदन देण्यात आले आहे. शरद पवळे, संदीप कोल्हे, संदीप मावळे, भाऊसाहेब वाळुंज, दशरथ वाळुंज, विठ्ठल शिंदे, प्रवीण गायकवाड यांनी निवेदन दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT