Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गिरीश महाजन यांचे नगरसेवकावंरील नियंत्रण सुटले!

Sampat Devgire

निखिल सूर्यवंशी

धुळे : येथील (Dhule) महापालिकेत अडीच वर्षांपूर्वी भाजपची (BJP) बहुमताने सत्ता आली. त्यावेळी कारभारावर नियंत्रणासाठी स्टेअरिंग कमिटीद्वारे पक्षाचे खासदार डॉ. सुभाष भामरे, https://www.sarkarnama.in/topic/subhash-bhamre आमदार गिरीश महाजन, (Girish Mahajan) आमदार जयकुमार रावल यांचे नियंत्रण राहिल, असे सांगण्यात आले. कालांतराने त्यांचे ‘स्टेअरिंग’वरील नियंत्रण सुटल्याने महापालिकेचा कारभार अनियमिततेच्या गर्तेत अडकल्याचा आरोप होतो आहे. धुळेकरांना दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्‍वासन हवेतच विरले आहे. (Dhule city people facing serious issues related to corporation)

भाजपच्या सत्ता काळातही महापालिका क्षेत्रात रोज आठवड्यानंतर पाणीपुरवठा होत आहे. याविषयी नियोजनाअभावी तक्रारी वाढल्याने नवीन अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करण्याकडे महापालिकेसह खासदार डॉ. भामरे यांचा कल आहे. ही सकारात्मक स्थिती आहे. तापी, डेडरगाव पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासह अक्कलपाडा योजना १६९ कोटींच्या निधीतून साकारत आहे.

शहरी योजनांची स्थिती

तत्पूर्वी, भाजपच्याच सत्ता काळात यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत १५० कोटींच्या निधीतून शहरातील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलणे व नवीन जलकुंभ उभारण्याचे काम झाले. ही योजना यशस्वी झाली की नाही याविषयी विरोधकांनीही साशंकता व्यक्त केली आहे. ठिकठिकाणच्या गळतीचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. यानंतर केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत १५४ कोटींच्या निधीतून भुयारी गटार योजना हाती घेण्यात आली. गुजरातच्या ठेकेदाराने करारनाम्यातील अटीशर्तीप्रमाणे रस्ते दुरुस्तीच्या कामाला खो दिला. कामे निष्कृष्ट दर्जाची केली. ही योजना फेल होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे धुळेकर म्हणतात.

रस्ते विकासाची वाट

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी शहराला विशेष योजनेंतर्गत रस्ते विकासासाठी शंभर कोटींचा निधी दिला. तो सार्थकी लागला किंवा नाही याचे मूल्यमापन अद्याप झालेले नाही. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनीही जिल्हा वार्षिक योजनेतून महापालिकेला ३२ कोटींचा निधी दिला. त्यातून रस्ते विकासाची कामे प्रस्तावित झाली. या योजनांमधील बरीच कामे मार्गी लावण्यात आली आहेत. परंतु, कामांच्या दर्जाबाबत तक्रारी होताना दिसतात.

अनेक प्रश्‍न भेडसावताहेत

काही योजनांकडे लक्ष वेधत महापालिका आणि भाजपचे पदाधिकारी शहर विकासाचे स्वप्न रंगवताना दिसतात. मात्र, त्याचवेळी वाढती अतिक्रमणे, पार्किंग, निमुळत्या रस्त्यांचे विस्तारीकरण, नवीन विकसित होणाऱ्या भागांबाबत नियोजनाचा अभाव, मूलभूत सोयीसुविधांची वानवा, रस्त्यांची कामे व कचरा संकलनाची वाताहत, एलईडी दिव्यांप्रश्‍नी धीमी कार्यवाही, असे एक ना अनेक प्रश्‍न शहराला भेडसावत आहेत. त्याविषयी सत्ताधारी व प्रशासन काहीही बोलायला तयार नाही.

आयुक्त भाजपचेच ऐकतात

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, येथील महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे भाजपचेच ऐकून चालतात, अशी तक्रार विरोधकांकडून होते. त्यांच्यासह अभियंते कुठल्याही कामाची तपासणी किंवा पाहणी करत नाही. तरीही ठेकेदारांची बिले गतीने निघतात, असे नगरसेवकच सांगतात. अशा विविध प्रश्‍नांसंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि प्रधान सचिवांशी शनिवारी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT