Eknath Khadse & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांचे खडसेंना सडेतोड उत्तर, 'तुमचे राजकारण संपले'

Sampat Devgire

Mahajan Vs Khadse: भाजप नेते गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील आरोप, प्रत्यारोप थांबण्याचे नावच घेत नाहीत. हे दोन्ही नेते एक दुसऱ्याचा समाचार घेण्याची संधीच शोधत असतात. त्यासाठी ते एकही संधी सोडत नाही. मंत्री महाजन यांनी पुन्हा एकदा खडसे यांना डिवचले आहे.

भाजप नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार एकनाथ खडसे यांनी जामनेर मतदार संघात झालेल्या कार्यक्रमात मंत्री महाजन यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. मंत्री महाजन यांच्या मतदारसंघात आपल्या कारकीर्दीत किती धरणे आणि कामे झाली, याचा पाढाच खडसे यांनी वाचला होता.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या विस्तारकांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जामनेर मतदार संघात तयारीचा मेळावा नुकताच झाला. यावेळी मंत्री महाजन यांनी खडसे यांच्या टीकेची सव्याज परतफेड केली.

महाजन म्हणाले, श्री. खडसे इतरांच्या मतदारसंघात जाऊन दौरे करतात. आरोप, प्रत्यारोप करतात. मात्र त्यांच्या स्वतःच्या मुक्ताईनगर- बोदवड मतदार संघात त्यांचे काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्याची काळजी त्यांनी केली पाहिजे.

इतरांच्या मतदारसंघात जाऊन श्री. खडसे यांच्या हाती काहीही पडणार नाही. खडसे यांनी विविध प्रकल्प केले, असे ते सांगतात. मी सुद्धा अनेक वर्ष सत्तेत आहे. विविध पदांवर मी होते. त्यामुळे अनेक कामे केली आहेत.

श्री. खडसे यांना त्यांच्याच मतदारसंघातील बोदवड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडवता आला नाही? हा प्रश्न अजूनही कसा शिल्लक राहिला, असा प्रश्न महाजन यांनी केला.

मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्र आणि राज्य शासनाने लोकांच्या हितासाठी अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. या योजनांची यशस्वी अंमलबजावणी झालेली आहे. त्यातून लोकांना सुविधा मिळाल्या आहेत, असे सांगितले.

केंद्र आणि राज्यातील सरकार बाबत नागरिक समाधानी आहेत. कार्यकर्त्यांनी या सर्व योजना मतदारांना जाऊन सांगाव्यात. सगळ्यांनी एकत्र येऊन आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारात झोकुन द्यायचे आहे. सर्वांनी एक दिलाने काम केल्यास आगामी विधानसभा निवडणूक आपण शंभर टक्के जिंकू.

त्याबाबत कोणतीही शंका राहिलेली नाही. विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीच मुद्दे नाहीत. लोकसभा निवडणुकीत जळगाव मध्ये त्यांना काहीही प्रभाव दाखवता आला नाही. त्यामुळे विरोधक उसने अवसान आणत आहेत. विरोधक त्यात ते कधीच यशस्वी होणार नाही असा दावा देखील मंत्री महाजन यांनी केला

या मेळाव्यात पक्षाचे निरीक्षक आमदार आशिष देसाई, रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी खासदार बन्सीलाल गुर्जर, जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, चंद्रकांत बाविस्कर, सुरेश धनके, प्रा. शरद पाटील, संजय देशमुख, संजय गरुड यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी विविध टिप्स दिल्या.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT