Dr. Bharti Pawar
Dr. Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori Loksabha; राज्यमंत्री भारती पवार यांना `कसबा` पॅटर्नचे आव्हान?

Sampat Devgire

दिंडोरी (Dindori) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राज्यातील सर्वात सुरक्षित लोकसभा मतदारसंघ असे बोलले जाते. मात्र सलग चार निवडणुकांत येथे भाजप (BJP) विजयी झाले आहे. अर्थातच त्यात शिवसेनेच्या (Shivsena) पॉकेट व्होटचे योगदान असायचे. यंदा शिवसेना भाजप बरोबर नसेल. ती महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) भाग आहे. त्यांना `वंचित`ची साथ आहे. त्यात माकप सहभागी झाल्यास भाजपच्या पाचव्या विजयासाठी राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांना एकाकी झुंजावे लागेल. (Minister of state Dr. Bharti Pawar will be without shivsena This time)

सहकार, द्राक्ष आणि कांदा या मतदारसंघातील तीन घटक आहेत. शरद पवार यांचा प्रभाव देखील आहे. दरवर्षी कांदा दराचा व शेतीवरीलसंकटाचा प्रश्न येथे असतो. त्यावर सर्वाधीक व आक्रमक आंदोलने होतात. मात्र निवडणुकीमध्ये हा मुद्दा चर्चेत मागे पडतो. राष्ट्रीय मुद्दे पुढे येतात. आगामी 2024 च्या निवडणुकीत काय होईल?. पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालेल का? की राष्ट्रवादी पराभवाचा वचपा काढील, याचीच सध्या चर्चा आहे.

शिवसेनेत बंड होऊन एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार गेले. त्यात येथील एकमेव सुहास कांदे शिंदे यांच्यासोबत गेले. विकासासाठी हा निर्णय घेतल्याचा त्यांचा दावा आहे. परंतु यातून उद्धव ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूती या मतदारसंघात वाढली. येवला मतदारसंघात शिवसेनेचे तीस ते पस्तीस हजार हक्काची मते आहेत. निफाडमध्ये देखील तेव्हढीच लक्षणीय मते आहेत. वनजमीन, कांदा हे दोन प्रश्न सध्या गाजत आहे. लाँग मार्च मुंबईकडे निघाला आहे. या दोन प्रश्नांवर केंद्र असो वा राज्य दोन्ही सत्ताधारी पक्ष व त्यांचे नेते स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे घडते आहे.

कळवण-सुरगाणा मतदारसंघाशी संबंधीत हा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपकडे येथे हक्काचे मतदान आहे. नांदगावला सुहास कांदे यांचा वैयक्तीक करिष्मा भाजपच्या पत्थ्यावर पडेल. एकंदर महाविकास आघाडीच्या मदतीला `वंचित` आहे. त्यात `माकप`ची भर पडल्यास भाजप शिंदे गटाच्या भरवशावर राहील. त्यामुळे आगामी 2024 च्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीसाठी दिंडोरी सुरक्षीत मतदारसंघ होऊ शकेल, हे नाकारता येत नाही.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व भाजपच्या डॉ. पवार सध्या दिंडोरीचे प्रतिनिधीत्व करतात. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. पवार यांना 5,67,470 (50 टक्के) मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले 3,68,691 (32 टक्के) यांचा पराभव केला. या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सुरगाणा, दिंडोरी आणि पेठ या तीन तालुक्यात प्रभाव आहे. या पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित यांना 1,09,570 (10 टक्के) तर वंचित बहुजन आघाडीचे बापु बर्डे यांना 58,847 (5 टक्के) मते मिळाली होती. ही आकडेवारी भाजपला विजय गेल्या निवडणुकीएव्हढा सोपा नाही हेच सांगतो.

सलग चार वेळा भाजप

हा पुर्वीचा मालेगाव मतदारसंघ. तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पुर्नरचनेनंतर त्यातून मालेगाव वगळले. तो दिंडोरी झाला. येथे 2004 पासून सलग तीन वेळा भाजपचे हरीश्चंद्र चव्हाण व सध्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार विजयी झाल्या. गेल्या दहा निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास येथे 5 वेळा भाजप, दोनदा जनता दल तर तीनदा काँग्रेसला कौल मिळाला आहे. हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यांची लढत मालेगावचे नेते (कै) निहाल अहमद यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाशी होत असे. त्यात जो पक्ष केंद्रात सत्तेत त्याचा मालेगावला खासदार असे समिकरण होते.

या मतदारसंघात 89.07 टक्के ग्रामीण आणि 10.93 टक्के शहरी भाग आहे. त्यात 7.88 टक्के मागासवर्गीय तर 36.77 टक्के आदिवासी मतदार आहेत. सध्या येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (येवला), विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (दिंडोरी), दिलीप बनकर (निफाड), नितीन पवार (कळवण) हे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे, डॉ. राहुल आहेर (चांदवड) हे भाजपचे तर एकनाथ शिंदे गटाचे सुहास कांदे (नांदगाव) आमदार आहेत. स्वतः डॉ. पवार कळवणच्या आहेत. त्यांना (कै) ए. टी. पवार यांचा वारसा आहे. मात्र त्यांच्याच कुटूंबात आमदार नितीन पवार राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीत त्यांना कळवणमधून पाच हजाराची निसटती आघाडी होती. हे चित्र बोलके आहे.

चांदवड-देवळा आणि येवला शहर वगळता मतदारसंघात भाजपचा लश्क्षणीय प्रभाव दिसत नाही. भाजपची शिंदे गटाशी आघाडी असल्याने आमदार कांदे यांच्या व्यक्तीगत प्रभावाची मते नांदगावमध्ये भाजपला मिळतील. उर्वरीत सर्व चार विधानसभा मतदारसंघात त्यांची लढाई एकाकीच असेल. यंदाची ही राजकीय स्थिती विचारात घेता भाजपला मतांसाठी झटावे लागेल. याउलट येवला, निफाड, दिंडोरी आणि चांदवडला शिवसेनेचे हक्काचे मतदान आहे. शिंदे गट वेगळा झाल्यावर हे कार्यकर्ते, नेते अधिक जोमाने महाविकास आघाडीसाठी कार्यरत झाले आहेत. त्यांना मतदारांची सहानुभूती मिळणार हे नक्की.

संपर्क घटल्याची चिंता

डॉ. पवार या केंद्रात राज्यमंत्री झाल्याने पक्षाने त्यांना केंद्रातील आपल्या विविध प्रकल्पांत अडकवून ठेवले आहे. त्यांच्या पश्चात मतदारसंघातील मतदारांशी संपर्काचा दुसरा स्त्रोत नाही. त्यामुळे डॉ. पवार यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे. डॉ. पवार मतदारसंघात आल्यावर फक्त भाजप व परिवाराच्या लोकांच्या संपर्कात असतात. ही त्यांची एक मर्यादा आहे.

यापुर्वीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण भाजपबरोबरच अन्य संघटना, राजकीय पक्ष गटांना सांभाळून घेत होते. तो त्यांचा निवडणूक जिंकण्याचा `युएसपी` होता. त्याचा भाजपला लाभ झाला. 2024 च्या निवडणुकीत तो नसेल. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार आहेत. त्यांचा मतदानावर किती प्रभाव पडेल याची चर्चा यंदाही आहे. मात्र दोन्ही काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या जोडीला माकप असु शकतो. तसे झाल्यास भाजपच्या मतांची ओहोटी तर आघाडीची भऱती असेल. त्यामुळे भाजपला मतांसाठी झुंजावे लागेल यात शंका नाही.

पवार जाऊबाई लढतील का?

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला तेव्हढा प्रभावी चेहरा शोधावा लागेल. विधानसभेचे उपसभापती, आमदार नरहरी झिरवाळ, नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार ही संभाव्य नावे आहेत. युवा चेहरा म्हणूम झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ आणि नितीन पवार यांचे चिरंजीव ऋषिकेश हे उमेदवार होऊ शकतील. त्यात जयश्री पवार या भारती पवार यांच्या जाऊबाई आहेत. त्यांच्यातून विस्तवही जात नाही, अशी भाऊबंदकी आहे. त्या दोघी मैदानात उतरल्यास दिंडोरीची चर्चा राज्यभर होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT