NCP Leader Eknath Khadse
NCP Leader Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कितीही चौकशी करा, छळा.. घाबरणार नाही!

Sampat Devgire

सावदा : गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपच्या (BJP) विस्तारासाठी रक्ताचे पाणी करून काम केले. सर्व संस्थांमध्ये पक्षाची सत्ता आणली. नाथाभाऊंच्या (Eknath Khadse) आशीर्वादाने अनेक जण मोठे झाले. आपल्यासोबत होतो तर चांगला होतो आणि पक्ष बदलला तर `इडी`ची (ED) चौकशी. माझी कितीही चौकशी करा, छळा, त्रास द्या.. मी घाबरणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले.

तांदलवाडी (सावदा) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता खडसे म्हणाले, की माझ्यामुळे कुणी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, उपाध्यक्ष, जिल्हा बँक संचालक झाला. आज हेच लोक गद्दार निघाले. माझी कितीही चौकशी लावा, घाबरणाऱ्यातील नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे मला कोणतीही भीती नाही. भलेही मला छळतील, त्रास देतील. पण माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

ते म्हणाले, ‘पब्लिक सब जानती है, कोन कैसा है’, कोण जिल्हापेठेत राहतो. बुधवारपेठेत जातो. तीस वर्षांपूर्वी मी भाजपचा एकटा आमदार होतो, पण आम्ही मेहनत घेऊन एकाचे दोन, दोनाचे तीन आणि सहा केले. मंत्री झाले. साऱ्या जातीपतीच्या लोकांना सोबत घेऊन भाजप पक्ष वाढविला. पण त्या माणसाला पक्ष झाला नाही, तो तुम्हाला काय होणार, अशी टिकाही खडसेंनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, की रोहिणीताई यांच्यावरील हल्ल्याची चौकशी सुरू आहे. आमचा प्रशासनावर विश्वास आहे. गावगुंडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. राष्ट्रवादी हा जनतेची बांधिलकी आणि कामे करणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहोत. अनेक जण पक्षात प्रवेश करीत आहेत. जिल्हा बँकेत आपले २० जण निवडून आलेले आहेत. पण भाजपकडे खासदार, आमदार असा सक्षम उमेदवार असताना पराभवाच्या भीतीमुळे त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीतून पळ काढला.

जळगाव राष्ट्रवादीमय करणार

रोहिणी खडसे - खेवलकर म्हणाल्या, की तांदलवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी टिकून ठेवला म्हणूनच आज राष्ट्रवादीत प्रवेश करू शकलो. भविष्यात आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे सांगितले.

गावातील रस्ते, गटारी, पाण्याची टाकी अशी बरेच विकासकामे नाथाभाऊ यांच्या माध्यमातून तांदलवाडीत झाली, असे प्रास्ताविकात तांदलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य शशांक पाटील यांनी सांगितले. या वेळी तांदलवाडीच्या सरपंच सुरेखा तायडे व खिर्डी येथील शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतप्रवेश केला. पक्षात काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला पदे देऊन बळ देतात येईल, असे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, राज्य वस्त्रउद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष रोहिणी खडसे - खेवलकर, माजी आमदार अरुण पाटील, सुनील नेवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, उपसभापती सुनीता चौधरी, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील,सिद्धार्थ तायडे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT