M. P. Heena Gavit & BJP leaders
M. P. Heena Gavit & BJP leaders Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काँग्रेसशी साटेलोटे असते, तर राज्य सरकार विरोधात बोलले नसते!

Sampat Devgire

धुळे : धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने त्यांच्या अधिक जागा निवडून आल्या, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chanfrakant Raghuwanshi) केले होते. एकीकडे त्यांनी असे म्हणायचे आणि दुसरीकडे नंदुरबार जिल्हा परिषदेत त्यांच्यासह शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणीतून सत्ता ताब्यात ठेवायची, अशी बोचरी टीका करत भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित (Heena Havit) सवयीप्रमाणे वक्तव्ये करत असल्याचेही नमूद केले.

खासदार डॉ. गावित यांची शनिवारी येथे पत्रकार परिषद झाली. यानंतर अनेक प्रश्‍नांना त्या सामोरे गेल्या. धुळे-नंदुरबार जिल्हा बँक निवडणूक आणि विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे साटेलोटे असल्यानेच बँकेत या पक्षांना अधिक जागा मिळाल्या, तर आमदार अमरिशभाई पटेल बिनविरोध निवडून आले, अशी टीका सर्वत्र होत असल्याकडे काही पत्रकारांनी खासदार डॉ. गावित यांचे लक्ष वेधले. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये नंदुरबार जिल्ह्याचेच आदिवासी विकास मंत्री आहेत. सरकारवर टीका करताना ते काँग्रेसचे असल्याने भाजपला चालत नाहीत. प्रत्यक्षात जिल्हा बँक निवडणुकीत मात्र त्याच आदिवासी विकास मंत्र्यांच्या पक्षाशी हात मिळवणी केली जाते, असाही प्रश्‍न उपस्थित झाला.

त्यावर खासदार डॉ. गावित म्हणाल्या, की साटेलोटे असते तर महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीबाबत पत्रकार परिषद घेतली नसती. आमदार पटेल यांचे केवळ भाजपमध्येच नाही तर सर्व पक्षात चाहते आहेत. ते लोकप्रिय असल्याने बिनविरोधचा निकाल लागला. जिल्हा बँकेचा कारभार आमदार पटेल आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्‌धतीने चालला. त्यामुळे त्यांच्यावर मतदारांसह सर्वपक्षीयांनी निकालातून विश्‍वास दर्शविला. त्यात भाजपच्या सोईच्या राजकारणाचा प्रश्‍न येत नाही.

राज्य सरकारवर आरोप

सरदार सरोवर प्रकल्पातील १०.८९ टीएमसी पाणी खानदेशातील तापी नदीकडे वळविण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी बोगदा करावा लागणार आहे. तो शंभर मीटर उंचीचा असेल. या प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली आहे. याबाबत दहा वर्षापूर्वी सर्वेक्षण झाले होते. ते आता नव्याने करावे लागणार आहे. त्यासाठी निधीची गरज आहे. परंतु, त्याविषयी राज्य शासन दखल घेत नसल्याचा आरोप खासदार डॉ. गावित यांनी केला. हीच स्थिती आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांची आहे. त्यांचे सिंचनातून जीवनमान बदलावे म्हणून पूर्वीच्या उपसा सिंचन योजना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी खासदार म्हणून केंद्राकडे निधी मागितला आहे. केंद्राने होकार दिला असला तरी राज्य शासनाकडून केंद्राला प्रस्ताव जात नसल्याचाही गंभीर आरोप डॉ. गावित यांनी केला.

यावेळी महापौर जयश्री अहिरराव, उपमहापौर भगवान गवळी, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती वंदना थोरात, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी, नगरसेवक हिरामण गवळी, माजी नगरसेवक ओम खंडेलवाल, यशवंत येवलेकर, चंद्रकांत गुजराथी, महादेव परदेशी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रोहित चांदोडे, अमोल धामणे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT