Balasaheb Thorat in Trible confrence
Balasaheb Thorat in Trible confrence Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

इंदिरा गांधी, सोनिया गांधी अन् राहुल गांधींचा आदिवासींवर खूप जीव आहे

Sampat Devgire

नाशिक : काँग्रेस सरकारने नेहमीच आदिवासींच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीदेखील काँग्रेसने काहीच केले असे बोलले जाते. परंतु आतापर्यंतच्या आदिवासींच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, (Indira Gandhi) पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, (Soniya Gandhi) खासदार राहुल गांधीही (Rahul Gandhi) प्रथम आदिवासींच्या विकासाचा विचार करता. त्यांचा या समाजावर खूप जीव आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यस्तरीय आदिवासी मेळाव्याचे महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. अजूनही अनेक कामे प्रलंबित आहेत, त्यासाठी काही उणिवा राहिल्या आहेत. या उणिवा दूर केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

श्री. थोरात म्हणाले, की दिवंगत इंदिरा गांधी यांच्यापासून पक्षाचे आदिवासी समाजावर प्रेम राहिले आहे. हीच परंपरा सोनिया गांधी, राहुल गांधी सांभाळत आहे. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळातच आदिवासींना त्यांच्या मूळ जमिनी परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच सर्वप्रथम देशात आदिवासींसाठी स्वतंत्र नऊ टक्के बजेटची तरतूद, शैक्षणिक शुल्क यांसह विविध योजना काँग्रेसच्या काळात झाल्या आहेत. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी पक्षाकडून प्रयत्न झाला. मात्र, अद्यापही पूर्ण विकास साधता आलेला नाही. अजूनही काम संपलेले नाही. बोगस आदिवासी, अनुसुचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग, आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या असे अनेक प्रश्‍न मार्गी लावायचे आहेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन हे प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडून सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासनदेखील श्री. थोरात यांनी दिले.

माजी मंत्री श्री. मोघे यांनी मार्गदर्शन करत काँग्रेसने आदिवासींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र आता या प्रश्‍नाकडे काहीअंशी दुर्लक्ष झाल्याने समाज सध्या नाराज आहे. काँग्रेस आमदारांची संख्याही घटली आहे. यामुळे आदिवासी समाज पक्षावर का नाराज आहे? याची कारणे शोधून त्या दूर कराव्यात. तसेच आजच्या मेळाव्यास पक्षातील नेते यांनी पाठ दाखवत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांची ही नाराजी पक्ष व समाजासाठी चांगली नसल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

मेळाव्याच्या सुरवातीस रायगड, अमरावती, नाशिक येथील आदिवासी कलापथकाने पावरा, मांगी नृत्याचे सादरीकरण करत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. यालाही पदाधिकाऱ्यांसह उपस्थितांनी दाद दिली.

स्वतंत्र संमेलन भरवा

आदिवासी समाजातही अनेक साहित्यिक आहेत. मात्र त्यांची दखल घेतली जात नसल्याचे सातत्याने पुढे येत असते. त्यामुळे आदिवासी साहित्यिकांचे स्वतंत्र संमेलन भरविण्याची सूचना आदिवासी विकास परिषदेस केली. खेळातही आदिवासी खेळाडूंनी देशाचे नाव जगभरात गाजविले आहे. त्यामुळे अशा खेळाडूंचा मेळावा घ्यावा, अशी सूचनाही श्री. थोरात यांनी करत त्यास पक्ष पूर्ण मदत करेल, असे आश्‍वासन दिले.

यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, आमदार डॉ. सुधीर तांबे, हिरामण खोसकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, आयोजक नगरसेवक राहुल दिवे, लकी जाधव, नगरसेविका वत्सला खैरे, विनायक माळेकर, राजाराम पानगव्हाणे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, भारत टाकेकर, ॲड. आकाश छाजेड, अ‍ॅड. संदीप गुळवे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT