arrested.jpg sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : कामे न करताच अपहार करणाऱ्या सरपंचासह ग्रामसेवकाला अटक

Sampat Devgire

Nashik News : निवाने कळवण गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप उर्फ महेश पाटील यांचे पॅनल निवडून आले होते. येथे गेली पाच वर्ष विकास कामे न करता पैशांचा अपहार करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

यासंदर्भात कळवण पोलिस ( Police ) ठाण्यात ग्राम विकास अधिकारी युवराज सोनवणे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतील 30.49 लाख रुपयांचा अपहार झाला. त्यामुळे महिला सरपंचासह तिघांना पोलिसांनी आज अटक केली.

या गावात रस्ते आणि विविध ग्रामविकासाची कामे जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात आली होती. 2017 ते 2021 या कालावधीत हा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून विविध विकास कामे झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र एकही काम झालेले नाही. पंचायत समितीकडे तक्रारी आल्यानंतर त्याबाबत चौकशी झाली. या चौकशीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ग्रामसेवक भास्कर पुंजाराम बागुल, सरपंच बेबीताई शिवाजी सोनवणे आणि पैसा समितीच्या अध्यक्ष यशोदाबाई विठोबा माळी या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आदिवासी गावात पेसा योजनेअंतर्गत विकासासाठी प्राधान्याने निधी दिला जातो. मात्र या निधीचा प्रत्यक्ष विकासासाठी उपयोग न होता निधी अपहार झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

या गावांमध्ये 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप उर्फ महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून आले होते. यातील सरपंच आणि पदाधिकारी आदिवासी व अल्पशिक्षित आहेत. त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन हे प्रकरण घडल्याचे बोलले जाते. अपहाराच्या या प्रकरणात करविता धनी वेगळ्याच असून करून गेला एक आणि शिक्षा झाली भलत्याला असा प्रकार घडल्याची चर्चा गावात आहे.

पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी 2017 ते 2021 या कालावधीतील ग्रामपंचायत रेकॉर्ड तपासले. मात्र हे रेकॉर्ड उपलब्ध होऊ शकले नाही. महत्त्वाचे पुरावे अध्यापही जप्त झालेले नाहीत. त्यामुळे आरोपींनी संबंधित निधीचा अपहरण केला. हे पैसे कोणी व कसे खर्च केले? त्याचा तपास सध्या पोलिस करीत आहेत.

अटक केलेल्या संशयित्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ आणि त्यांचे सहकारी या अपहरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणात पंचायत समितीचे देखील काही मोठे मासे गळायला लागण्याची शक्यता आहे.

आदिवासी गावांमध्ये कामे न करताच लाख रुपयांचा अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे कोणत्या राजकीय नेत्यांचा हात आहे. याचाही तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी होत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT