Narhari Zirwal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal : 1500 रुपयांमध्ये सर्व लाडक्या बहिणी खूश, 2100 रुपये देऊ असे म्हटलेच नव्हते ; झिरवाळ साहेबांचा 'यू टर्न'

Ladki Bahini Yojana, Narahari Zirwal statement : महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनावर यू टर्न घेतला आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नव्हतं असं ते म्हणाले आहेत.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेचा महायुतीला चांगलाच फायदा देखील झाला. लाडक्या बहिणींच्या कृपेनं महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले. निवडणूक प्रचारा दरम्यानच महायुती सत्तेवर आल्यास १५०० रुपयांची रक्कम २१०० रुपये केली जाईल असे आश्वासनच लाडक्या बहिणींना महायुतीकडून देण्यात आलं होतं.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी मिळणार? त्याची वाट पाहत आहेत. त्याचवेळी महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनावर 'यू टर्न' घेतला आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले जातील असे कोणीही जाहीर केलेलं नव्हंत. १५०० रुपयांमध्ये सर्व लाडक्या बहिणी खूश आहेत. २१०० रुपये दिले जाणार नाहीत असे झिरवाळ यांनी स्पष्ट केलं.

मंत्री झिरवाळ हे जळगाव दौऱ्यावर असून तिथे त्यांनी माध्यमांशी यासंदर्भात संवाद साधला. ते पुढे म्हणाले, लाडक्या बहिणी नाराज आहेत हे आपणच सांगत असतो. किंवा विरोधक तसे सांगतात. पण लाडक्या बहिणी सर्व बाजूंनी खूश आहेत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं कोणीही जाहीर केलेलं नाही.

मात्र, लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देखील दिले जाणार नाहीत असा दावा विरोधक करत होते. महिलांना आम्ही पंधराशे रुपये दिल्यानंतर विरोधकांनी २१०० रुपयांवर जोर धरला. मात्र, १५०० रुपये सुद्धा परिपूर्ण आहे. महिला त्यात खूश आहे असा 'यू टर्न' झिरवाळांनी घेतला आहे.

अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी दिली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यावर विचारले असता झिरवाळ म्हणाले की, मंत्रिमंडळात नव्या लोकांना संधी द्यावी हे चांगले धोरण आहे. नव्या चेहऱ्यांना त्यातून संधी मिळेल. छगन भुजबळ व अनिल पाटील यांनाही मंत्रिमंडळात सामावून घ्यावं अशी आमची विनंती आहे. अजित दादा त्यावर निर्णय घेतील.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना झिरवाळ म्हणाले, आणखी किती वर्ष त्यांनी मुख्यमंत्री राहावे, हे जनता ठरवेल. जनताच जनार्दन आहे. चांगले काम करत राहिल्यास निश्चितच त्यांचा आशीर्वाद मिळतो. दरम्यान झिरवाळ यांनी अशाप्रकारे लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यावरुन घेतलेला यू टर्न पाहाता यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT