Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेच्या बंडात राज्याचे पोलिस इंटेलिजन्स ब्यूरो ठरले ‘फेल्युअर’!

Sampat Devgire

नरेश हळणोर

नाशिक : महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्र (Maharashtra) पोलिस दल अनेक स्तरांवर ‘फेल’ ठरले. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसार माध्यमांसमोरच पोलिस दलातील उणिवांचे वाभाडे काढले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये पोलिस दलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली तरीही, ‘फेल्युअर’चा ठपका काही महाराष्ट्र पोलिसांना पुसता आला नाही. (Blot on Maharashtra police image in Shivsena mLA rebel case)

आमदारांच्या संरक्षणासाठी असलेल्या सर्व पोलिसांनाही गुंगारा देण्यात राज्याचे गृहराज्यमंत्री व मंत्री-आमदार यशस्वी झाले. याचा ना त्या संरक्षणासाठी पोलिसांना थांगपत्ता लागला, ना महाराष्ट्र पोलिसांच्या इंटेलिजन्स ब्यूरोला खबर लागली. त्यामुळे स्कॉटलंड पोलिसांशी नेहमीच होणारी महाराष्ट्र पोलिसांची तुलना खरीच मानावी का, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.

राज्याचे गृहराज्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांना कंमाडो दर्जाची सुरक्षारक्षक आहे. तर, शिवसेनेचे बंडखोर मंत्री, आमदारांना एक, दोन वा त्यापेक्षा अधिक पोलिसांचे सुरक्षाकवच असते, जे २४ बाय ७ त्यांच्या समवेत असतात. त्यामुळे मंत्री, आमदारांच्या ज्या-ज्याठिकाणी वावर असतो, त्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून पोलिस असतातच.

या सर्वांच्या हालचालीचा तपशील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सहज उपलब्ध होत असतो. याशिवाय, महाराष्ट्र पोलिस दलात राज्य गुप्तवार्ता विभाग व अन्य गोपनीय विभाग कार्यरत असून, शेकडो अधिकारी, कर्मचारी यात सदैव कार्यरत असतात. अशी सारी यंत्रणा पूर्वीपासून आहे. आता तर डिजिटायझेशनमुळे पोलिसांचा गोपनीय विभाग अधिक सक्षम असायला हवा होता. परंतु, तरीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र पोलिसांचा हाच गोपनीय विभाग अनेक आघाड्यांवर-प्रकरणांमध्ये फेल्युअर ठरल्याचे वारंवार दिसून आले आहे.

प्रथमदर्शनी राज्यावर सध्या ओढावलेल्या परिस्थितीला महाराष्ट्र पोलिसांचा गोपनीय विभागाच जबाबदार असल्याची चर्चा याच पोलीस वर्तुळात आहे.

झारीतले शुक्राचार्य शोधा?

(स्व.) विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एका गटाने बंडखोरी करीत मुंबईतून पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या गोपनीय विभागाने ही माहिती तत्काळ (स्व.) देशमुख यांना दिली. त्यानंतर बंडखोरी करून पलायनाच्या तयारी असलेल्या तत्कालीन आमदारांना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्या वेळी त्या बंडखोरांचे बंड तर शमलेच, शिवाय सरकारवरचे संकटही टळले होते.

असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत; परंतु पोलिसांच्या गोपनीय विभागाच्या सतर्कमुळे अशी बंडखोरी सरकारांना उधळून लावण्यात यश आले होते. मात्र, सध्याच्या महाराष्ट्र पोलिसांचा गोपनीय विभाग सतत ‘फेल’ का ठरतोय, याबाबत शंका उपस्थित होऊ लागली असून, यामागे झारीतले शुक्राचार्य कोण, याचा शोध घेण्याची हीच वेळ असल्याचीही चर्चा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये होत आहे.

उपमुख्यमंत्र्यांची नाराजी

दोन-अडीच वर्षांतील अनेक घटनांसंदर्भात पोलिसांना आलेल्या अपयशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करताना गोपनीय विभागाचे वाभाडे काढले आहेत. गृह खाते राष्ट्रवादीकडे असले तरी खात्याच्या मंत्र्यांपर्यंतच गोपनीय माहिती न पोहोचविणे, तसेच पोलिस दलातील असमन्वयाबाबत श्री. पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांचीही पिसे काढले आहेत. त्यानंतरही महाराष्ट्र पोलिस दलाच्या कामकाजात कोणतीही सुधारणा न झाल्याचेच सध्याच्या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.

कारवाई होणार का?

सध्याच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र पोलिसांतील गोपनीय विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यामुळे बंडखोरी केलेल्या गृहराज्यमंत्र्यांसह मंत्री व आमदारांकडे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचारी, या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेणारे अधिकारी आणि ती माहिती गोपनीय शाखेला न पोहोचणाऱ्या अशा सर्वांवर कारवाई होणार का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT