Mangesh Chavan & Unmesh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: भाजप आमदार चव्हाण यांचे उन्मेष पाटलांना आव्हान, "१० वर्षात काय दिवे लावले"

Sampat Devgire

BJP Vs Shivsena UBT: गेले काही दिवस चाळीसगावचे राजकारण गिरणा नार-पार नदी जोड प्रकल्पावरून तापले आहे. यामध्ये आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आपल्या विरोधकांना थेट आव्हान दिले.

नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्प गेले काही दिवस वादाचा विषय ठरला आहे. यावरून भाजपवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती. भाजपमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी खासदार उन्मेष चव्हाण यांनी याबाबत मोठे आंदोलन उभारले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी गिरणा धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन केले होते. यावरून आता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी खासदार पाटील यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गिरणा नदीजोड प्रकल्पाचा विषय चर्चेत येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी माजी आमदार (कै) रामभाऊ जिभाऊ पाटील यांचा जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. यावेळी आमदार चव्हाण यांच्या पुढाकाराने १२ कोटी निधीतून उभारलेल्या कृषी भवनाचे भूमिपूजन झाले. यावेळी पाचशेहून अधिक शेती तज्ञ आणि शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या निमित्ताने भाजपचे आमदार मंगेश चव्हाण महायुतीच्या विविध नेत्यांना एकत्र करण्यात यशस्वी झाले. माजी आमदार साहेबराव घोडे भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, के. बी. पाटील, कृषी भूषण अरुण निकम, बाळासाहेब राऊत, आर. के. पाटील, भगवान परदेशी आदी विविध नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आमदार चव्हाण यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनावासी झालेल्या माजी खासदार पाटील यांना यावेळी थेट आव्हान दिले. माजी खासदार पाटील यांनी नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पावर आंदोलन केले होते. हा संदर्भ पकडून आमदार चव्हाण यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले.

आमदार चव्हाण यांनी, `काही लोकांनी गिरणा नदी पात्रात जलसमाधी घेण्याचे आंदोलन केले होते. त्यासाठी ते पाण्यात उतरले. मात्र गेली दहा वर्षे सत्तेत असताना या लोकांनी काय केले? हा प्रश्न आहे. मतदारसंघातील जनतेला अशा बोलघेवड्या नेत्यांची चांगलीच सवय झाली आहे. त्यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी टिका केली.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या नावावर बोलणे सोपे असते. मात्र काम करायची वेळ आल्यावर परिस्थिती अवघड असते. गेल्या दहा वर्षात या लोकांनी काय दिवे लागले, हे सबंध मतदार संघाला माहिती आहे. गिरणा नदीचा उगम कुठे होतो? मन्याड धरण कसे भरते? तितुर नदी कशी वाहते? याची या लोकप्रतिनिधीला काहीही माहिती नाही.

अशा बोलबच्चन लोकांना मी कृतीतून उत्तर देणार आहे. चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाच्या लवकरच निविदा निघतील. पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार कोटींचा निधी करण्यास राज्य शासन तयार आहे. त्यामुळे नार-पारच्या आधी गिरणा नदीचे पाणी मन्याड धरणात आणू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यानिमित्ताने माजी खासदार पाटील यांच्या आंदोलनाला भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकमेकांशी भिडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी नुकतीतील राजकारणाची दिशा या निमित्ताने स्पष्ट झाली.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT