Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : सोशल मीडियावर नको, मैदानात उतरून पाठिंबा द्या! मराठा क्रांती मोर्च्याच्या संयोजकांनी मंत्री, आमदारांना सुनावलं

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राज्यभरातील समाज बांधव सहभागी झाले आहेत. मात्र, अद्यापही बहुतांश मराठा आमदार काठावर राहून सावध भूमिका घेत आहेत.

Sampat Devgire

Nashik News, 31 Aug : मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राज्यभरातील समाज बांधव सहभागी झाले आहेत. मात्र, अद्यापही बहुतांश मराठा आमदार काठावर राहून सावध भूमिका घेत आहेत.

यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक नाना बच्छाव यांनी सत्ताधारी आमदारांना थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरू असलेले आंदोलन निर्णायक आहे. असंख्य गरजवंत आणि सामान्य मराठा समाज या आंदोलनात सहभागी झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील आमदार सरोज अहिरे आणि दोन्ही खासदार भास्करराव भगरे आणि राजाभाऊ वाजे वगळता अन्य लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यातील अनेक आमदार सत्ताधारी असल्याने बोटचेपी भूमिका घेत असल्याचे दिसते. या आमदारांनी आता कुंपणावर बसून दुहेरी भूमिका घेण्याचे टाळावे, असा इशारा बच्छाव यांनी दिला आहे.

अनेक लोकप्रतिनिधी सोशल मीडियावर पोस्ट टाकून पाठिंबा जाहीर करत आहेत. सोशल मीडियावर व्यक्त केलेला पाठिंबा हा खरा पाठिंबा कसा समजायचा? सध्याची लढाई अत्यंत प्रबळ असलेल्या सरकारशी मैदानात उतरून करण्याची लढाई आहे. त्यामुळे आमदारांनी सोशल मीडियावर नव्हे तर प्रत्यक्षात आझाद मैदानावर येऊन याबाबत आपली भूमिका जाहीर केली पाहिजे, असे आवाहन बच्छाव यांनी केले.

मुंबईत आझाद मैदानावर सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नाशिकमधून पाठिंबा वाढत आहे. आंदोलनाच्या दुसऱ्याच्या दिवशी येवला आणि लासलगाव येथील कार्यकर्त्यांनी 'एक भाकरी समाजासाठी' हा उपक्रम राबवला. एक गाडी भरून भाजी आणि भाकरी आंदोलकांना पुरविण्यात आली.

आता ग्रामीण भागातही त्याचा विस्तार होत आहे. सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, नांदगाव, लासलगाव नाशिक येथूनही अनेक कार्यकर्ते आता आंदोलकांसाठी भोजनाची व्यवस्था करीत आहेत. सुरुवातीला 2 दिवस महायुती सरकारने आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बच्छाव यांनी केला.

पिण्याचे पाणी, जेवण, स्वच्छतागृहे बंद करून आंदोलक माघारी फिरावे असा सरकारचा विचार असावा. त्यासाठी नवी मुंबई, ठाणे आणि अन्यत्र जेवण घेऊन येणाऱ्या गाड्या देखील अडवल्या होत्या. आता नाशिक, पुणे, मुंबई आणि रायगड या परिसरातील कार्यकर्ते आणि सामाजिक दातृत्व म्हणून अनेक संस्थांनी आंदोलकांसाठी रसद पुरवठा सुरू केला आहे.

त्यामुळे आंदोलन कितीही दिवस चालले तरीही अडचण येणार नाही. मात्र जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यास त्याची सर्व जबाबदारी राज्य सरकारवर असेल. त्यामुळे सरकारने याबाबत बैठकांमध्ये वेळ न घालवता जलद निर्णय घेऊन समाजाला आरक्षण द्यावे, असा इशाराही बच्छाव यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT