Nashik News: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केली. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आता या प्रश्नावरून भाजपमध्ये अंतर्गत वादाला फोडणी मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, डॉ राहुल आहेर आणि दिलीप बोरसे यांसह विविध अधिकृत उमेदवारांविरोधात भाजपच्या नेत्यांनी बंडखोरीचे आव्हान उभे केले होते. यातील बहुतांश बंडखोर एव्हढे प्रबळ होते की, पक्षाच्या अधिकृत उमेदवारापेक्षा त्यांच्या मागेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि यंत्रणा उभी राहिल्याचे दिसले.
यातील बहुतांश बंडखोरी केलेल्या उमेदवारांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. या संबंधांचा उपयोग करून आणि विविध इशारे देत बंडखोरांनी भाजपमध्ये प्रवेशाची तयारी केल्याचे कळते. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार अस्वस्थ झाले आहेत. त्याची पहिली प्रतिक्रिया नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याने पुढे आली आहे.
नाशिक पूर्व मतदार संघात आमदार ढिकले यांच्या विरोधात स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे उमेदवारी केली होती. या बंडखोरीला सामाजिक संदर्भ देखील होते. त्यामुळे भाजपचे काही माजी नगरसेवकांनीही गणेश गीते यांना मदत केली होती.
नाशिक पश्चिम मतदार संघात आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात सभागृह नेते दिनकर पाटील यांनी बंडखोरी केली. त्यांनी मनसेची उमेदवारी घेतली. त्यांना ३५ हजारांहून अधिक मते मिळाली. चांदवड मतदार संघात पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि नाफेडचे संचालक केदा आहेर यांनी बंडखोरी केली होती. केदा आहेर यांना देखील चाळीस हजारांहून अधिक मते मिळाली.
या बंडखोरांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची अक्षरशः दमछाक होईल, असे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे आमदार आणि बंडखोर यांच्यात निवडणुकीत झालेले आरोप, प्रत्यारोप आणि राजकीय हल्ले निवडणूक संपल्यावरही संपलेले नाहीत. आता या काही बंडखोरांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची संधान करून भाजपमध्ये प्रवेशाची तयारी सुरू केल्याच्या बातम्या आल्या आहेत.
भाजपचे पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार या चर्चेमुळे संतप्त आहेत. आमदार ढिकले, दिनकर आढाव, पप्पू माने यांसह विविध नेत्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याला विरोध केला आहे. अशा बंडखोरांना पक्षात प्रवेश दिल्यास आपण सामुहीक राजीनामे देऊ, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी देखील १६ बंडखोऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला नुकसान पोहोचविण्यासाठी या बंडखोरांनी प्रयत्न केले. त्यांच्या शिवाय देखील पक्ष मजबूत आहे, असे आम्ही सिद्ध केले आहे.
जवळपास विविध माजी नगरसेवक आणि नेत्यांसह १६ प्रमुख नेते भाजप सोडून गेले. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली. या नेत्यांचा पुढचा राजकीय प्रवास काय, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. एकंदरच या बंडखोरांनी निवडणूक संपल्यावरही आपल्या हालचाली वेगवान केल्याने निवडून आलेल्या आमदारांची डोकेदुखी चांगलीच वाढण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.