Dr. Rahul Aher
Dr. Rahul Aher Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Rahul Aher; नार -पार प्रकल्पास दोन महिन्यात मान्यता!

Sampat Devgire

देवळा : नाशिक (Nashik) व जळगाव (Jalgaon) जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या नार -पार गिरणा नदीजोड प्रकल्पास राज्यशासनाच्या (Maharashtra Government) ८ हजार कोटीच्या निधीतून येत्या दोन महिन्यात मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) यांनी विधानसभेत सांगितले, अशी माहिती आमदार डॉ. राहुल आहेर (Dr. Rahul Aher) यांनी दिली. (Dy. C. M. assures BJP MLA Dr. Rahul Aher for river connection projects)

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की नार -पार गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. नार-पार प्रकल्पासाठी गेल्या अधिवेशनात देखील चर्चा झाली होती. विविध नेते व लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता.

चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. आहेर यांनी शुक्रवार विधानसभेत याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यात पश्चिमेला जे चाळीस टी.एम.सी.पाणी वाहून जाते परंतु आताच्या डिपीआरमध्ये दहा टी.एम.सी.पाणी वळविण्याचे प्रयोजन आहे ते आपण वाढवणार का?, गोदावरी खोऱ्याला पाणी वळवणे, चांदवड -देवळा तालुक्यांसाठी हायराईज कॅनॉल घेणे, या मागणीची लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. त्या सुचनेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर दिले.

यासाठी साधारणतः आठ हजार कोटीचा निधी राज्य शासन खर्च करणार असून या योजनेचा सविस्तर प्रकल्पअहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, नार, पार, औरंगा व आंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्या महाराष्ट्र राज्यात उगम पावून पश्चिमीकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात. हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे. एकात्मिक राज्य जल आराखड्यातील तरतुदीनुसार नार, पार, औरंगा व आंबिका या पश्चिमी वाहिनी नदी खोऱ्यातील ३०४.६ दलघमी पाणी नार- पार- गिरणा नदीजोड योजनेमुळे वळविण्याचे नमूद आहे.

या योजनेमध्ये ९ धरणे प्रस्तावित आहेत. मानखेडे, सालभोये, मांजरपाडा या ३ लिंकद्वारे २६०.३० दलघमी पाणी उध्वगामी नालिकेद्वारे उपसा करून चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचे प्रस्तावित असून पुढे ७९.९२ किमी. लांबीच्या प्रवाही बंद नलिकेद्वारे सिंचन करणे आहे. त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पारोळा या तालुक्यातील एकूण ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे. या प्रकल्पामुळे देवळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT