Girish Mahajan Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गिरीश महाजनांकडून उत्तर महाराष्ट्राला ‘जलGift’; त्या बहुचर्चित प्रकल्पाची वर्क ऑर्डर जारी

Nar-Par Girna Project : CM देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने हा महत्वाकाक्षी प्रकल्प साकार होत असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यातील जलसुरक्षेचा आधारस्तंभ ठरणार आहे.

Ganesh Sonawane

Nar-Par Girna Project : उत्तर महाराष्ट्रासाठी लाईफलाईन ठरणाऱ्या बहुचर्चित नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने वर्क ऑर्डर जारी करत प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला आहे. या प्रकल्पाला मिळालेल्या कार्यारंभ आदेश हा उत्तर महाराष्ट्रासाठी जलक्रांतीचा प्रारंभ मानला जात आहे.

वर्षानुवर्ष दुष्काळ, अनियमित पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींशी लढत आलेल्या आणि पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प आशेचा नवा किरण ठरणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या जलसुरक्षेला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांच्या कृषी व पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन बळ मिळणार आहे.

गिरणा खोरे प्रकल्प विभाग, नाशिक यांच्या माध्यमातून मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि आयसीसी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाकडे हे काम सोपविण्यात आले आहे.

समुद्रात वाहून जाणारे पाणी गिरणा खोऱ्यात

उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची तहान भागविण्यासाठी नार-पार-गिरणा प्रकल्पांतर्गत कोकण पट्टयात समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पावसाचे पाणी वळवून ते गिरणा खोऱ्यात आणले जाणार आहे. सुरगाणा, पेठ आणि परिसरातील नदी खोऱ्यांतील पाणी विविध धरणे, बोगदे, पंपिंग स्टेशन आणि पाइपलाइनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात पोहोचविले जाणार आहे.

९ धरणांची करणार उभारणी

या प्रकल्पात पुढील ९ धरणांची उभारणी केली जाणार आहे.

उंबरपाडा,

सारन्यावन,

प्रतापगड,

राक्षसभुवन,

मिलान,

घोडी,

उखेडमाळ,

सावरपाडा

देवमाळ

तसेच माणखेड आणि सालभोये येथे मोठे जलसाठे विकसित करण्यात येणार असून अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो-मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचे विस्तृत जाळे उभारण्यात येणार आहे. गिरणा खोऱ्याकडे पाणी वळविण्यासाठी विशेष बोगद्यांची निर्मितीही केली जाणार आहे.

शेतीला होणार फायदा

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः कोरडवाहू पट्टयातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. यातून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची आशा आहे.

दरम्यान, या प्रकल्पासंदर्भात पर्यावरणीय मंजुरी, वनक्षेत्र, जमीन संपादन, आदिवासी भागातील पुनर्वसन आणि वाढता खर्च या मुद्यांवर गेल्या काही वर्षांत मोठी चर्चा झाली होती. मात्र राज्य शासनाने प्रकल्पाला प्राधान्य देत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

विकासाचा नवा अध्याय

घटते भूजल, हवामान बदल आणि वाढती पाण्याची मागणी या पार्श्वभूमीवर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा केवळ सिंचन प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यातील जलसुरक्षेचा आधारस्तंभ ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल‌ असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT