Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नरेंद्र मोदींचा कारभार म्हणजे, `कपडे काढून लंगोट देण्याचा प्रकार`

Sampat Devgire

नाशिक : देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना उपाययोजना मात्र होतांना दिसत नाही. केंद्रातील (Centre) भाजप (BJP) सरकारचे काम म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर ५० रुपयांनी वाढवायचे आणि मग केवळ पाच -दहा रुपये कमी करण्याचा प्रकार म्हणजे कपडे काढून घेऊन लंगोट देण्याचा हा प्रकार असल्याची टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. (BJP in power st Centre fail to give relief to people)

येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे विविध कार्यकारी सोसायटी संचालकांचा सत्कार सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा प्रवास हा विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून पुढे आला. आपला प्रवास हा महापौरांपासून सुरू झाला. पुढे येवल्यात विकासाला अधिक वाव असल्याने येवलेकरांच्या इच्छेनुसार आपण येवल्याला प्राधान्य दिले. गेले वीस वर्षांपासून येवला मतदारसंघातील नागरिकांनी मोठे प्रेम दिले. त्यांच्या जोरावर आज आपण येवल्याचा विकास करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात विविध कार्यकारी संस्थांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यांपैकी अनेक संस्था आजही प्रामुख्याने कर्जवाटपाचेच कार्य करताना दिसतात. आजही इतर व्यवहार यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापन कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे संचालकांनी कर्जवाटप करणे एवढेच आपले काम हा असा समज बदलून आपल्या कामाच्या कक्षा अधिक विस्तारित कराव्यात असे आवाहन करत सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नाशिकला कृषी टर्मिनल मार्केट मंजूर केले होते. सदर प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली असून लवकरच अद्ययावत कृषी टर्मिनल उभे राहणार आहे. या कृषी टर्मिनल मार्केटमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला मोठी बाजार पेठ निर्माण होणार आहे. या टर्मिनल मार्केटच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील शेतमाल देशासोबत परदेशात पाठविण्यासाठी टर्मिनल अतिशय उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सद्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले असून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. याबाबत राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. कांदा शेतकरी ज्या ज्या वेळी अडचणीत आला त्या त्या वेळी पवार साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून निर्यातीसह अनेक प्रश्न सोडविले त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र सध्या केंद्रात भाजपचे सरकार असतांना कांद्याच्या प्रश्नांवर भाजपचे लोक आंदोलन करत आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन बसावं आणि हा प्रश्न सोडवावा असा चिमटा काढला. केंद्र सरकारकडे नाफेडसह इतर संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, अरुण थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, व्याख्याते प्रा.गणेश शिंदे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, विश्वासराव आहेर, तहसीलदार प्रमोद हिले, सहायक निबंधक प्रताप पाडवी, मुख्याधिकारी मुतकेकर, शेतकरी संघटनेचे संतु पाटील झांबरे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT