Nashik March  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Hindu March : 'त्या' एक तासात काय घडले?, पोलिस आणि जमावाचा पाठशिवणीचा खेळ !

Sampat Devgire

Nashik Hindu Samaj March : नाशिक शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी अथक परिश्रम करून जमाव पांगवला. मात्र, अफवांमुळे त्यात अडथळे येत होते. शहरातील बडी दर्गा भागात देखील हा जमाव गेला होता. त्यांच्या पाठोपाठ पोलिसांचा बंदोबस्त ही होता. यावेळी काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यावेळी हवेत गोळीबार केल्याची ही अफवा पसरली होती. मात्र त्यात तथ्य आढळून आले नाही.

नाशिक शहरात शुक्रवारी सकल हिंदू समाजातर्फे बंद पुकारण्यात आला होता. या बंदला चांगला प्रतिसाद होता. सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून फिरणाऱ्या आणि आक्रमक घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी या तणावात भर घालण्याचे काम केले. अल्पसंख्यांक वस्ती असलेल्या जुने नाशिक भागात दुपारी दीड ते दोन या दरम्यान घडलेल्या काही घटनांनी शहरभर अफवांचे अमाप पीक आले. काही ठिकाणी दोन समाजाचे जमाव एकमेकांसमोर आले. पूर्ण माहिती नसताना परस्पर विरोधी घोषणा देण्यात आल्या. (Nashik Hindu March News)

या घोषणांनी अति उत्साही तरुणांनी दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. रस्त्यात लावलेले अडथळे हटविण्यासाठीही प्रयत्न झाले. यावेळी काही युवक दांडके घेऊन आलेले होते. त्यामुळे एकंदरच परिस्थिती शांत करण्यासाठी पोलिसांना खूप परिश्रम करावे लागले.

यावेळी काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही युवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याने जमाव पांगला. मात्र, हा जमाव पांगल्यानंतर एका ठिकाणाहून दुसरीकडे गेल्यावर तेथे दुसरी अफवा येत होती. त्यातून ठिकठिकाणी दहा ते पंधरा मिनिटांनी तणावाचे स्पॉट निर्माण होत होते. दूध बाजार, भद्रकाली मार्केट, मेन रोड, खडकाळी पॉईंट, बडी दर्गा या भागात एकापाठोपाठ एक युवक जमत होते.

हा प्रकार सुरू असताना सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते झेंडे घेऊन घोषणा देत शालिमार येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जमले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या जात होत्या. आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) आणि काही कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. शहरात शांतता भंग करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. त्यांच्यावर गंभीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पोलीस त्यांची समजूत आणि हस्तक्षेप करून त्यांना दुसरीकडे पाठवीत होते. हा सर्व घटनाक्रम दुपारी दीड ते अडीच या कालावधीत घडला. या एक तासातील या घटनाक्रमानमुळे शहरात ठिकठिकाणी तणावाच्या अफवा पसरल्या आणि काही भागात तणाव निर्माण झाला. त्यानंतर तो नियंत्रणात आणण्यासाठी राज्याच्या पोलिस नियंत्रण कक्षाकडून देखील पोलीस आयुक्तांना सूचना देण्यात आल्या. या प्रकाराची गृह विभागाने गंभीर दखल घेतली.

पोलीस आयुक्तांनीही काही ठिकाणी भेटी दिल्या. पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या सर्व भागात सातत्याने गस्त घालत होते. शांतता प्रस्थापित निर्माण करण्यासाठी जास्तीचा बंदोबस्त दूध बाजार आणि भद्रकाली परिसरात नियुक्त करण्यात आला.

दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस बल, गृहरक्षक दलाचे कर्मचारी आणि पोलीस असा हा बंदोबस्त होता. यावेळी शहरभर पोलिसांचे गस्तीपथक सायरनसह गस्त देत होते. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होऊन परिस्थिती नियंत्रणात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT