Maharashtra Politics : विधान परिषदेच्या नाशिक व जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीतील भाजप व शिवसेनेमधील अंतर्गत वाद माघारीची मुदत संपल्यावरही कायम आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची माघार नाशिकशी पुरक असल्याचे सांगितल्याने जळगावमध्ये त्यांनी माघार घेतली तरच नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे माघार घेतील असे संकेत यातून मिळाले आहेत.
नाशिकमध्ये महायुतीची अधिकृत उमेदवारी शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना मिळालेली आहे. परंतु भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांच्यामुळे त्यांच्यामार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यात भाजपच्या प्रसाद हिरे यांनीही बंडखोरी केली आहे. नरेंद्र दराडेंपुढे भाजपच्या दोन बंडखोरांचे आव्हान आहे.
त्याचवेळी जळगाव विधानपरिषद निवडणुकीत गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे नंदकिशोर महाजन यांना महायुतीची उमेदवारी मिळाली आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी तिथे बंडखोरी करत अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे महाजनांचे शिलेदार नंदकिशोर महाजन यांच्यापुढे मतविभागणीचे आव्हान उभे राहिले आहे.
नाशिक मधील गोकुळ गिते यांच्या उमेदवारीमागे भाजपची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गिते हे गिरीश महाजन यांचे ऐकतील असे सांगत संकटमोचक महाजनांना त्यांच्या माघारीसाठी साद घातली. पंरतु त्याचवेळी शिवसेनेने जळगावमध्ये रेश्मा काळेंची उमेदवारी कायम ठेवत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत असून यातूनच हा विषय अधिक गुंतागुतींचा बनला आहे.
एकीकडे, शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील तसेच किशोर पाटील यांनी नाशिकमध्ये बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केल्यास, जळगावतही शिवसेनेच्या उमेदवाराकडून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना जाहीर पाठिंबा दिला जाऊ शकतो असे संकेत आपल्या वक्तव्यातून दिले आहेत .
तर, दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावची घटना नाशिकला पूरक असल्याचे माध्यमांना सांगून एक प्रकारे जळगावमधून शिंदेसेनेने माघार घेतली तरच नाशिकमधून माघार घेतली जाईल असे संकेत दिले. यातूनच जळगावात खरोखर रेश्मा काळेंनी माघार घेतली तर, नाशिकमध्ये गोकुळ गितेंवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातूनच त्यांना आपली तलवार म्यान करावी लागू शकते.
त्यामुळे एकप्रकारे ही स्पर्धा केवळ स्थानिक बंडखोरांपुरती न राहता वरिष्ठ नेत्यांमध्येही दिसू लागली आहे. वरिष्ठ नेत्यांकडूनच दोन्ही जागांवर एकमेकांची अडवणूक होताना दिसत आहे. हा वाद महायुतीच्या समन्वय समितीच्या कोर्टात पोहचला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रश्न निकाली निघण्याची आशा आहे. त्यामुळे नक्की जळगावमधून आधी माघार होते की, नाशिकमधून.. की, या वादात बंडखोरी पुढेही कायम राहते. हे पाहावे लागणार आहे. इथेच महायुतीतील अंतर्गत समन्वयाची खरी कसोटी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.