Nashik Pune railway route : नाशिक-पुणे रेल्वे मार्ग शिर्डीकडे नेल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. हा मार्ग पूर्वीप्रमाणे नाशिकहून संगमनेर मार्गे नेण्यात यावा, अशी मागणी जोर धरत असताना, संगमनेरमध्ये जनआंदोलन उभं राहत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हात फलक घेऊन लक्ष वेधले. पण हीच रेल्वे अकोले मार्गे जावी यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी मागणीचा फ्लेक्स घालत नागपूर विधिमंडळ परिसरात एन्ट्री घेतली.
‘नाशिक–पुणे रेल्वे संगमनेर मार्गे गेलाच पाहिजे’ अशी ठाम भूमिका घेत संगमनेरचे (Sangamner) आमदार अमोल खताळ यांनी नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाबाहेर अनोख्या पद्धतीने आंदोलन करत लक्ष वेधून घेतलं. डोक्यावर फलक घेऊन, त्यांनी केलेली निदर्शनं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.
आमदार खताळ यांच्यापाठोपाठ अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोले इथले आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी देखील आज मागणीचा फ्लेक्स घालून विधिमंडळात एन्ट्री घेतली. रेल्वे मार्ग हा अकोले मार्ग गेलाच पाहिजे, अशी त्यांनी मागणी लावून धरली. अकोले आदिवासी भाग आहे, इथं औद्योगिक विकासा चालना देण्यासाठी हा मार्ग अकोल्यातून गेलाच पाहिजे, यासाठी अजित पवार यांच्या माध्यमातून केंद्राकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचे आमदार लहामटे यांनी सांगितलं.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ‘नाशिक–पुणे रेल्वेमार्गाचा संगमनेर–आळेफाटा मार्ग सोईस्कर नाही. त्यामुळे मार्ग शिर्डीतून नेला जाईल, असं जाहीर केलं. या घोषणेमुळे संगमनेरबरोबरच अकोल तालुक्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा मार्ग बदलल्यास दोन्ही तालुक्याचा विकास ठप्प होईल. याच पडसाद आता अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.
नाशिक–पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न अनेक वर्षांपासून धुळखात आहे. सुरूवातीला हा मार्ग संगमनेर तालुक्यातील नेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन देखील संपादित करण्यात आली होती. शेतकर्यांना मोबदला देखील दिला गेला होता. महारेलमार्फत या प्रकल्पात राज्य सरकारचा 50 टक्के वाटा आहे. अचानक मार्ग बदलून तालुक्याला दिलेला वळसा हा अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
हाच मार्ग अकोले इथून जावा, अशी मागणी देखील जोर धरून आहे. यासाठी अकोले तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष एकटवले आहेत. यासाठी आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी आता पुढाकार घेतला आहे. रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी विधिमंडळात आमदार लहामटे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या वादात आणखी एका तालुक्याची एन्ट्री झाल्याने अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. रेल्वेमार्गाच्या बदलामुळे भविष्यात कोणत्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी घडतात, तसेच सरकारची भूमिका काय राहणार याकडे संगमनेर आणि अकोले तालुक्याबरोबर शिर्डीसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.