Ajit Pawar- Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narahari Jirwal : कोकाटे सुटले आता झिरवाळ अडकले, अजित पवारांच्या मागे अडचणींची रांगच लागलीय

Ajit Pawar NCP : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात संपूर्ण राज्यातील अन्न विभागातील प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केलं आहे.

Ganesh Sonawane

Narhari Zirwal protest : नाशिक जिल्ह्याला तब्बल चार मंत्री पदं मिळाली आहेत. त्यात नुसत्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे तिघेजण आहेत. त्यातील विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्याने व वादग्रस्त वक्तव्यांमुळे माणिक कोकाटे यांच्याविरोधात शेतकरी व विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असा दबाव अजित पवारांवर वाढला होता. त्याचा फटका कोकाटेंना बसला, त्यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढून घेण्यात आला. त्याऐवजी त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आता माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ नाशिकच्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे आता कोकाटेंचं मिटवंल आणि झिरवाळाचं सुरु झालं..यातून अजित पवारांची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे.

नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार व अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात राज्यभरात अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरु केलं आहे. चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांचे निलंबन केल्याच्या विरोधात अधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अधिकारी ठोस कारवाई करत नसल्याने निलंबन केल्याची माहिती दरम्यानच्या काळात मंत्री झिरवाळांनी दिली होती. मात्र अन्न औषध प्रशासन च्या अधिकाऱ्यांनी वेगळी माहिती दिली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. निलंबन झालेल्या अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यातील अन्न विभागातील प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केलं केल आहे. कोणतेही ठोस कारण नसताना मंत्री झिरवाळांनी अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई अपमानास्पद आहे. म्हैसूर येथील अहवालानंतर कारवाई केली असती तर चालले असते. मात्र, माहिती न घेता कारवाई केल्याचे म्हणत या कारवाईविरोधात सर्व कर्मचारी संघटना एकवटल्या असून, अधिकाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

नंदुरबार जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार यांनी 10 मार्च रोजी महेश व रमेश तंवर यांच्या दुकानावर छापा टाकत तपासणी केली. त्यावेळी रिफाइन्ड सोयाबीन व शेंगदाणा तेलाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने 11 मार्च 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. 9 मे रोजी या नमुन्यांचा अहवाल नंदुरबार कार्यालयास प्राप्त झाला, आणि अहवालानुसार दोन्ही नमुने अप्रमाणित असल्याचे कळवण्यात आले. नंदुरबार कार्यालयाकडून याबाबत माहिती संबंधित दुकानदाराला देण्यात आली. दरम्यान, 4 जून रोजी सदर नमुने फेरतपासणीसाठी म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पाठविण्यात आले होते.

नंदुरबारच्या अक्कलकुवा येथील दोन्ही व्यापाऱ्यांच्या दुकानात अप्रमाणित तेलाचे साठे आढळले. याप्रकरणी नाशिक विभागाचे सह आयुक्त महेश चौधरी व नंदुरबार जिल्ह्याचे सहा. आयुक्त संदीप देवरे आणि आनंद पवार यांचे निलंबन करण्यात यावे असे आदेश मंत्री झिरवाळ यांनी दिले. विधिमंडळात याप्रकरणी आमदार आमशा पाडवी यांनी प्रश्न विचारला होता त्यानुसार ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT