Dilip Bankar & Anil Kadam
Dilip Bankar & Anil Kadam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Niphad Politics; निफाडला बनकर आणि कदम लढतीत तिसरा कोण?

Sampat Devgire

नाशिक : विधानसभा (Assembly) निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजप (BJP) व शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यातील आडाखे व सत्तेतील गोंधळ लक्षात घेता केव्हाही निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो. त्याची अतिशय पद्धतशीर तयारी निफाड (Niphad) मतदारसंघात आमदार दिलीप बनकर, (Dilip Bankar) माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांनी सुरु केली आहे. त्यांच्या संघर्षात संधी शोधणारा तिसरा इच्छुक कोण याची उत्सुकता मोठी आहे. (NCP & Shivsena candidates begans Assembly election political prepration)

विधानसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीसोबत अर्थात मुदतपुर्व होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे निफाडमधील राजकीय नेते या लढाईसाठी आपला पक्ष, गट व समर्थक संभाव्य उमेदवारांमध्ये केंद्रीत होऊ लागल्याचे चित्र आहे.

आमदार बनकर याच्या सुसाट सुटलेल्या गाडीला महाविकास आघाडीची सत्ता खालसा झाल्याने विकासकामांना ब्रेक लागला. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेच्या माध्यमातुन विकासकामे मंजुरीचा धडका लावला होता. होमपिच असलेल्या पिंपळगांव बसवंत ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव त्यांच्या वाटयाला येणे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडुन आमदार बनकर यांची उमेदवारी निश्‍चीत असली तरी सध्याच्या राजकीय घडोमोडीतुन ते वेळीच सावध झाले आहेत.

राजकीय चातुर्याचे वरदान असलेले माजी आमदार अनिल कदम यांनी गत तीन वर्षातील संघर्षाच्या काळात विचलीत न होता मतदारसंघातील वावर कायम ठेवला आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी झालेल्या गर्दीची दखल त्यांच्या विरोधकांनाही घेणे भाग पाडले.

विशेष म्हणजे दुरावलेले नेते, कार्यकर्ते कदम यांच्याबाबत सकारात्मक चर्चा करतांना दिसतात. माजी आमदार कदम यांनी बेरजेचे राजकारण सुरू केल्याचे वाढदिवसाच्या निमीत्ताने दिसले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते पुन्हा आक्रमक झालेले दिसतात. मात्र त्यांच्या मार्गात मोठा अडथळा शिंदे गटाची उमेदवारी ठरू शकते. सध्याच्या राज्याच्या राजकारणात उध्दव ठाकरे गटाला मतदारांची सहानुभूती वाढत आहे. त्यामुळे केवळ शिवसेना नव्हे तर अन्य पक्षांची मतेही ठाकरे गटाकडे वळू शकतात. अर्थात राज्याच्या अनेक मतदारसंघात आहे तसा राजकीय घोळ या मतदारसंघातही आहे. कारण येथे जिंकलेला व दुसऱ्या क्रमांकावरील दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे आहेत. त्याचा फायदा विरोधकांना तर तोटा महाविकास आघाडीला अशी स्थिती आहे.

मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या यतीन कदम यांनी मतदारसंघ पादाक्रांत करण्यास सुरूवात केली आहे. मात्र त्यांचीही अशीच अडचण आहे. कारण शिंदे गट, मनसे आणि भाजप एका नावेत बसलेले आहेत. यतीन कदम म्हणजे स्वतःच्या विजयासाठी नव्हे तर कोणाच्या तरी पराभावसाठी उमेदवारी करतात, असा शिक्का त्यांच्यावर आहे. त्यामुळे पाडण्यासाठी नाही तर लढुन जिंकण्यासाठी उमेदवारी असल्याचा विश्वास त्यांना मतदारांत निर्माण करावा लागेल.

गेल्या चार महिन्यापासुन विधानसभा निवडणुकीच्या चर्चेत नवा व्टिस्ट आला आहे. शिवसेनेकडुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विद्यमान सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अर्थात मविप्रचे सभासद किंवा मतदार हा एक दबाव गट आहे. तो विजय किंवा पराभवाला कारणीभूत ठरू शकतो, स्वबळावर विजयी करण्यासाठीची संख्यात्मक स्थिती त्यांची दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT