Padmakar Valvi & Rajesh Padvi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Padmakar Valvi politics: वळवींचा झटका भाजपला, मात्र फटका बसणार आमदार राजेश पाडवी यांना!

Sampat Devgire

BJP Vs Congress News: उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यात भाजपला एकामागे एक धक्के बसत आहे. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परतीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही चिंता वाढत आहे.

आदिवासी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजपच्या गळ्याचा फास होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस नाशिक हे आदिवासी आंदोलनाचे केंद्र बनले आहे. आदिवासी समाजाने धनगर समाजाला आरक्षण देण्यास प्रखर विरोध आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोग रद्द करावा अशी आदिवासींची मागणी आहे. या मागणीवरून राजकीय नेते आणि आमदारांमध्ये स्पष्टपणे दोन गट दिसून आले आहेत. भाजपमधील लोकप्रतिनिधींचे या प्रश्नावर मौन आहे. मात्र सहकारी पक्ष आणि विरोधक आक्रमक आहेत. त्याचे परिणाम गेल्या काही दिवसात दिसून आले आहेत.

ताजे उदाहरण म्हणून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपचे नेते, माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. आता ते काँग्रेसमध्ये परतण्याची चिन्हे आहेत.

माजी मंत्री वळवी काँग्रेसमध्ये परतल्यास शहादा विधानसभा मतदारसंघाचे राजकारण बदलणार आहे. शहाद्याचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांना तो धक्का असेल. शहादा मतदार संघात काँग्रेस पक्ष निवडणुकीची जोरकसपणे तयारी करीत आहे.

माजी मंत्री वळवी हे स्वतः उमेदवारी करण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते. मात्र त्यांच्या घरातूनच एका उमेदवाराला संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या सगळ्यांचा मोठा परिणाम भाजपला बसू शकतो. त्यामुळे शहादा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली आहे.

पद्माकर वळवी हे आदिवासी पट्ट्यात काँग्रेसला खिळखिळी करण्यासाठी भाजपने आखलेल्या डावपेचाचा भाग म्हणून भाजपवासी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांचा प्रवेश झाला होता. काही महिन्यांतच ते बाहेर पडले आहेत. त्यांना भाजपच्या कामकाजाची पद्धत आणि धोरण मानवलेले नसावे.

माजी मंत्री वळवी यांचा धुळ्याच्या आदिवासी पट्ट्यातील राजकारणावर चांगला प्रभाव आहे. २००९ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी ते काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री मंडळाचे सदस्य देखील झाले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला.

माजी मंत्री वळवी यांना स्वतः उमेदवारी करण्यात फारसा रस नसल्याचे बोलले जाते. त्यांची कन्या सीमा वळवी ही जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष आहे. तिला राजकारणात स्थिरस्थावर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी अॅड सीमा वळवी यांना मिळावी, असा त्यांचा प्रयत्न असेल. त्यात ते कितपत यशस्वी होतात याची उत्सुकता आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT