Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखरेच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून येत, लोकसभेवेळी चहापानावेळी विरोधकांच्या गाठीभेटी घेतल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, खासदार प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे, नीलेश लंके यांच्यासह विरोधी पक्षाचे खासदार उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् खासदार लंके यांची भेट महाराष्ट्राच्या राजकीय घडामोंडीसाठी लक्षवेधी ठरली. राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ले संवर्धन मोहिमेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रायगडावर आयोजित सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना खासदार लंकेंनी आमंत्रण दिले. शरद पवार यांच्या शिलेदाराच्या आमंत्रणाला पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला असून, मोदी कार्यक्रमासाठी खरंच येतात का, याकडे लक्ष लागलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे साक्षीदार असलेल्या रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिलं. यानंतर पंतप्रधान मोदींनी देखील शक्य तितक्या प्रमाणात उपस्थित राहण्याची ग्वाही दिली.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी खासदार लंके यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे मनःपूर्वक कौतुक केलं. गड-किल्ले हे केवळ दगड-मातीचे अवशेष नसून ते स्वराज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक असल्याचे सांगत, या मोहिमेमुळे तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जाणीव आणि अभिमान निर्माण होत असल्याचे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं. अशीच लोकसहभागातून चालणारी मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, असा सल्लाही मोदींनी लंकेंना दिला.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 250 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अनेक सर्वसाधारण वाड्या-वस्त्या आजही पक्क्या रस्त्यांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा वाड्या-वस्त्यांना तातडीने रस्ते जोडणी करण्याची मागणी खासदार लंके यांनी केली. पक्क्या रस्त्यांमुळे शिक्षण, आरोग्य आणि शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले. सध्या सुरू असलेली कांद्याची निर्यात सुरूच ठेवण्यात यावी, अन्यथा बाजारपेठेत भाव कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच नाफेड व एनसीसीएफमार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या कांद्याच्या थकीत देयकांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ओझे वाढत असल्याचे सांगत, ही देयके तातडीने अदा करण्याची खासदार लंकेंनी केली.
सुपा औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता, त्या अनुषंगाने सक्षम दळणवळण सुविधा आवश्यक असल्याचे खासदार लंके यांनी नमूद केले. पुणे–अहिल्यानगर रेल्वे लाइन प्रकल्प, पुणे–अहिल्यानगर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे, तसेच पुणे–छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामाला गती देणे, या बाबी त्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या. या प्रकल्पांमुळे औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार नीलेश लंके यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. विकास, शेतकरी हितसंबंध आणि सांस्कृतिक वारसा जपणे या तिन्ही बाबी केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.