Uddhav Thackrey, Sharad Pawar & Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Politics: काँग्रेस म्हणते, "आमचा स्ट्राइक रेट जास्त, सर्वाधिक जागा हव्यात"

Sampat Devgire

Jalgaon Congress News: विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा जोरात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने उत्साह वाढलेल्या महाविकास आघाडीचे पक्ष आणि त्यांचे नेते सध्या अव्वाच्या सव्वा दावे करीत असल्याचे चित्र आहे. जळगावमध्ये काँग्रेस पक्षाने हाच कित्ता गिरवला आहे.

जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता. या मतदार संघात अनुक्रमे शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिले होते. या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले.

विकास आघाडीला जळगाव जिल्ह्यामध्ये एकही जागा मिळू शकली नाही. मात्र पराभवानंतरही स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्ये सध्या काँग्रेस पक्षाचे नेते रममान झाले आहेत. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे त्याची जाणीव होते.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अकरापैकी सर्वाधिक विधानसभेचे मतदार संघ आम्हाला मिळाले पाहिजेत, असा दावा केला. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसने उमेदवार नसतानाही मनापासून काम केले.

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्याग केला. त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम झाली.

याची जाणीव सहकारी पक्षांनी ठेवली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे. याची जाणीव सहकारी पक्षांनी ठेवायला हवी. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता.

जळगाव जिल्ह्यात अकरा जागांपैकी चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत. त्यांनी सध्या महायुतीच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल पाटील हे एकमेव आमदार निवडून आले होते. त्यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पारितोषिक म्हणून त्यांना राज्याचे पुनर्वसन मंत्री करण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे रावेर येथून शिरीष चौधरी हे एकमेव आमदार आहेत. उर्वरित भारतीय जनता पक्षाचे चार आणि शिवसेनेचे चार असे आठ आमदार आहेत. शिवसेनेचे सर्व आमदार एकनाथ शिंदे गटाबरोबर गेले आहेत. गुलाबराव पाटील हे मंत्री आहेत.

या चार जागांवर नैसर्गिक न्यायाने शिवसेना ठाकरे गटाचा दावा असेल. या व्यतिरिक्त भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती भक्कम झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही मतदारसंघांवर प्रभाव आहे. ग्राउंड लेव्हलला ही राजकीय स्थिती असताना काँग्रेसने केलेला दावा चर्चेचा विषय आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवार आणि आमदार शिरीष चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, अशोक कलाने, सलीम इनामदार, सचिन सोमवंशी यांचे विविध पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीची आमची तयारी आहे.

सर्वाधिक जागा लढवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जळगावच्या जागा वाटपावरून चांगलीच ओढाताण होण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसने केलेला दावा सहकारी पक्षांनाही आचंबित करणारा आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT