Amit Shah & Adv. Prakash Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Ambedkar politics: दहा वर्ष भाजप सरकार झोपले होते का? प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न

Sampat Devgire

Ambedkar on Amit Shah: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप खडबडून जागे झाले आहे योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला जात आहे त्याचा किती उपयोग होईल हा चर्चेचा विषय आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी टिका केली आहे.

या संदर्भात अॅड प्रकाश आंबेडकर यांनी आपले मतप्रदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते अमित शहा यांचे महाराष्ट्रात दौरे होत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे दौरे आहेत. ही भाजपची नेहेमीचीच राजकीय कार्यशेली आहे.

या भाजप नेत्यांनी कितीही राजकारण केले आणि महाराष्ट्राचे दौरे केले तरी त्याचा काहीही प्रभाव पडणार नाही. भाजपला त्याचा निवडणुकीत काहीही लाभ होणार नाही. असे सध्याचे चित्र आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, भाजपचे नेते निवडणुकीच्या तोंडावर गेल्या महिन्याभरात ३२ हजार कोटींच्या घोषणा आणि विकास कामे केल्याचा दावा करतात. त्यांचे हे राजकारण जनतेवर कोणताही प्रभाव टाकणार नाही. गेली दहा वर्षे भाजप सत्तेत आहे. लोक आता त्यांना त्याबाबत विचारण करीत आहेत.

लोक विचारतात, दहा वर्षे तुम्ही सत्तेत होते, तेव्हा झोपले होते का? दहा वर्षात विकासाच्या योजना का आणल्या नाही? लोकांचे प्रश्न का सोडवले नाही? त्याला भाजपकडे उत्तर नाही. ग्रामीण भागात तर महायुती सरकार विषयी अतिशय संतप्त भावना आहेत. ते कोणत्या भाषेत बोलतात, ते मी येथे बोलू शकणार नाही.

भाजपने आदिवासी आणि धनगर समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा निवडणुकीत उपयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र या विषयावर काम करणाऱ्या आदिवासी संघटना आणि नेते निश्चित आहेत. त्यांच्या मते ते भाजपवर नाराज आहेत.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तो सर्वांवर बंधनकारक आहे. त्यात आदिवासींच्या आरक्षणातून धनगर समाजाला काहीही मिळणार नाही. त्यामुळे भाजपने कितीही प्रयत्न केले, तरी आदिवासींचा सत्ता संपन्न होण्याकडे सुरू असलेल्या प्रवास ते थांबवू शकणार नाहीत.

आता याबाबत सरकार आदिवासींची जी कोंडी करीत आहे, त्यातून सरकारवर विरोधातच ॲट्रॉसिटीचा खटला दाखल करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आदिवासी अभ्यासक आता त्यावर बोलू लागले आहेत. त्याचा फटका या पक्षाला निश्चितच बसेल.

ॲड आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा त्यांच्यासोबत असलेल्या समाजाचा आग्रह आहे. त्यांनी निवडणूक न लढविल्यास त्यांच्यावर शरद पवार यांचे अनुयायी असा शिक्का बसेल.

तसे नको असेल तर जरांगे यांनी निवडणूक लढवावी. त्यातून मराठा समाजाचा घटक असलेल्या मतदारांचा पाठिंबा त्यांना मिळेल. तो प्रस्थापित मराठा नेतृत्वाला धक्का असेल. यातील वास्तविक स्थिती जरांगे पाटील यांनी जाणून घ्यावी, येत्या पंधरा दिवसात आचारसंहिता जाहीर झाल्यावर त्यांचा याबाबतचा निर्णय स्पष्ट होईल.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT