Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांना ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचा अभिमान : शरद पवार

कैलास शिंदे

जळगाव : विरोधात असताना आपण शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी शेतकरी दिंडी काढून लढा दिला, तर सत्तेत असताना केंद्रीय कृषीमंत्री झाल्यानंतर देशातील शेतकऱ्यांना ७२ हजार कोटी रूपयांची ऐतिहासिक कर्ज माफी दिली. शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा आपल्याला अभिमान आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. (Pride of giving Rs 72,000 crore loan waiver to farmers : Sharad Pawar)

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) चांदसर (ता. धरणगाव) येथे माजी आमदार मु. ग. पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी पालकमंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, मु. ग. पवार यांचा पुतळा अनावरण सोहळा हा आमचा कौटुंबीक सोहळा आहे. एक काळ असा होता की कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी आपल्यावर होती. आपण त्या वेळी सत्तेपेक्षा संघटना बळकट करण्याकडे आपण अधिक लक्ष दिले, त्यावेळी आपण शेवटच्या घटकापर्यत ऋणानुबंध जोडले. त्या वेळी आपण जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावांत फिरून संघटन केले. त्यावेळी शेती प्रश्‍न घेऊन जनमानसात उत्तम प्रकारे संपर्क असणारे मु. ग. पवार यांच्यासारखा कार्यकर्ता जोमाने कार्य करीत होता. संघटना बांधणीचे काम ते अत्यंत चांगल्या प्रकारे करीत होते. पुढे त्याच बळावर त्यांनी जळगाव जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणले, त्यावेळी त्यांना विधानपरिषदेवर आमदार आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे पदही देण्यात आले होते.

शेतकरी दिंडी आणि अटक

राज्यात दौरे करीत असताना आपण जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर या ठिकाणी कापूस आणि केळीचा प्रश्‍न आपल्याला दिसून आला, त्याच वेळी कापसाला भाव नसल्याचीही माहिती आपल्याला मिळाली. त्यामुळे आपण जळगावहून नागपूर विधीमंडळ अधिवेशनावर शेतकरी दिंडी काढण्याचे निर्णय घेतला. माजी आमदार मु. ग. पवार यांनीही याबाबतीत नियोजनाची जबाबादारी पार पाडली आणि आपण नागपूर विधीमंडळाच्या अधिवेशनावर शेतकरी दिंडी काढली. त्यावेळी (स्व.) यशवंतराव चव्हाण, सीताराम येच्युरी, देवीलाल आणि मला अटक झाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाची सोडवणूक झाली. शेतीसाठी आपण लढा दिला याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.

व्याजदर तीन टक्क्यांपर्यंत आणले

विरोधी पक्षात असताना आपण शेती प्रश्‍नासाठी लढा दिला असे सांगून पवार म्हणाले, की आपण देशाचे कृषीमंत्री झाल्यानंतर शेतकरी प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. देशातील शेतकऱ्यांना ७२ हजार कोटीची कर्जमाफी दिली, तसेच शेती कर्जावरील व्याजदर अगोदर ११ टक्के होता, त्यावरून तो तीन टक्के आणि त्यानंतर शून्य टक्के केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समन्वयक विकास पवार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT