Maharashtra Politics : आदिवासी समाजाच्या संविधानिक हक्क व अधिकारासाठी आदिवासी महापंचायत उपक्रम नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान येथे नुकताच पार पडला. या महापंचायतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांचे भाषण लक्षवेधी ठरलं. या भाषणात नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या खास शैलीत भाजप व मुख्यमंत्री फडणवीसांना जबाबदार धरत टार्गेट केलं.
एकीकडे एसटी आरक्षणात बंजारा व धनगर समाजाकडून होत असलेली घुसखोरी तर दुसरीकडे गेल्या ८० दिवसांपासून नाशिकमध्ये आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पेसा क्षेत्रातील सरपंच व पेसा अध्यक्षांच्या वतीने ही महापंचयात घेण्यात आली. यावेळी आपल्या भाषणात दिनकर पाटील यांनी सर्व दोषांचे खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले.
दिनकर पाटील म्हणाले, भांडणे केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच लावली. मी ११ वर्षे भारतीय जनता पक्षात होतो. त्यांचे उद्योग मी जवळून बघितले आहेत. नाशिक जिल्ह्यात चार मंत्री आहेत. मात्र नरहरी झिरवाळ सोडले तर एकही मंत्री आंदोलकांकडे फिरकत नाही. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे पाटील म्हणाले.
पाटील यांनी यावेळी भाजपच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली. त्यांनी या पक्षातील गुन्हेगार नेत्यांचा पाढा वाचत चांगलाच समाचार घेतला. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षातील नेते हे राज्यातील जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिनकर पाटील म्हणाले मी अकरा वर्षे या पक्षात काम केले असल्याने मला सगळं काही माहित आहे. हा पक्ष एकदम बोगस आहे आणि त्याची जाणीव मला आहे. त्यांनी यावेळी पक्षातील नेत्यांचे एकसे बढ़कर एक किस्से लोकांना सांगितले. मला लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. तीन वर्षे मी पायाला भिंगरी लावून फिरत राहिलो. पण, मला पक्षाने उमेदवारी दिली नाही. माझा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च झाल्याची खंत यावेळी दिनकर पाटलांनी बोलून दाखवली.
कोण आहेत दिनकर पाटील?
दिनकर पाटील हे नाशिकचे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. भाजपने तिकीट वाटपात डावलल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांनी त्यांना नाशिकच्या पश्चिम विधानसभा मंतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर उमेदवारी दिली. पाटील यांच्या उमेदवारीमुळे पश्चिमची लढत अधिक रंगतदार झाली. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांच्या प्रयत्नातून ते नाशिकमध्ये मनसेला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी सरकारविरोधात आंदोलने केली आहेत. ते कायमच भाजपला शिंगावर घेताना दिसतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.