Ramdas Athawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale News : रामदास आठवले म्हणतात, ‘मी पुन्हा शिर्डीत येईन...'

सरकारनामा ब्यूरो

शिर्डी : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. संधी मिळाली तर माझी शिर्डीतून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले. (Ramdas Athawale wants to contest the Lok Sabha elections again from Shirdi)

शिर्डीत रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शिर्डीत (Shirdi) आलेल्या रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आठवले म्हणाले की, माझी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत २०२६ पर्यंत आहे. पण, मला जर संधी मिळाली तर पुन्हा शिर्डीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.

नगरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत याबाबत माझे बोलणे झाले आहे. तसेच, इतर नेत्यांशीही चर्चा केली आहे. दिल्लीतही मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणार आहे, असेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.

आठवले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधीसाठी रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन शिर्डीत आयोजित करण्यात आलेले नाही. शिर्डी हे पवित्र ठिकाण असून महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. ही गोष्ट खरी आहे की २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीत हरलो होतो. सध्या मी राज्यसभेवर आहे. राज्यसभेच्या खासदारकीची मुदत २०२६ पर्यंत आहे. पण, मला शिर्डीतून लढण्याची संधी मिळाली तर माझी निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.

मी मोदी सरकारमध्ये मंत्री आहे. या भागाचा विकास करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. शिर्डी परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या मंत्रीपदाचा उपयोग होऊ शकेल. मला संधी मिळाली तर येथील जनताही माझ्यावर विश्वास टाकेल, असा आशावादही रामदास आठवले यांनी बोलून दाखवला.

रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशनाचे निमंत्रण दिले हेाते. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन-तीन वेळा भेटलो होतो, त्यामुळे ते उद्या अधिवेशनाला येतील, असे मला वाटते.

विरोधकांची बहिष्काराची भूमिका चुकीची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे नवीन संसद भवन उभारण्यात आलेले आहे. संसदेच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे चुकीचे आहे. मोदी यांनी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बनविले आहे. त्यामुळे विरोधकांनी जाणीवपूर्वक बहिष्कारची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी ती भूमिका घ्यायला नको होती. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्ष मोदींच्या पाठिशी उभे राहणार आहोत, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT