MLC Kapil Patil
MLC Kapil Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धर्माच्या नावे मॉब लीचिंगचे प्रकार ही विकृती!

Sampat Devgire

नाशिक : विखारी हिंदुत्वाचा (Hindutwa) अजेंडा चालविणारी चळवळ महात्मा गांधी (Mahatma Gandhiji) यांच्या हत्येनंतर जवळपास साठ ते सत्तर वर्षे थंडावली. परंतु, आता तेच लोक, तीच वृत्ती पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा देत असून तो नारा कधी अयोध्येतील राममंदिराचा (Ayodhya issue) तर कधी भोंग्याच्या रूपाने समोर येत असल्याचे प्रतिपादन आमदार कपिल पाटील (MLC Kapail Patil) यांनी केले. (Moblinching behind Religious agenda is fateful)

सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोळकर व्याख्यानमालेतील ‘धोक्याचा भोंगा’ या विषयावर १०१ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, राज ठाकरेंच्या भोंग्याच्या हल्ल्याने महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. त्यातील पहिली म्हणजे पोलिसांना पुणे येथील नास्तिक परिषद रद्द करावी लागली, तर दुसरी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार व कुटुंबीयांना आस्तिक असल्याचे पुरावे द्यावे लागले. या दोन्ही घटना पुरोगामी महाराष्ट्र कुठे आहे, हे दर्शविणारी ठरली.

नास्तिक म्हणजे वेदांना मानत नाही, मात्र आपल्याकडे नास्तिकतेचा अर्थ वेगळा म्हणजे ईश्‍वराला मानणारा नाही, असा घेतला जातो. तर वेद व मनुस्मृतीवर विश्‍वास ठेवणारा आस्तिक मानला जातो. नास्तिक व आस्तिकतेच्या दोन्ही व्याख्या समजावून सांगताना पाटील यांनी महात्मा गांधी यांच्यापासून ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याची विविध उदाहरणे दिली. जगात पहिले मॉब लीचिंग रामायणाच्या काळात झाले.

तेव्हापासून ते आतापर्यंत धर्माच्या नावे मॉब लीचिंगचे प्रकार सुरू आहे. दाभोळकर, पानसरे, कुलबर्गी यांच्या हत्येमागेही रामायणापासून सुरू असलेल्या मॉब लीचिंगचाच संदर्भ आहे. हत्येमागे मात्र एक बदल झाला आहे. हा बदल बहुजन समाजाच्या व्यक्तीचे ब्रेन वॉश करून त्या करवी झाला. पहिला हल्ला महात्मा फुले यांच्यावर झाला. त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी यांच्यावर हल्ले झाले.

या देशाला अस्पृश्‍यतेचा मोठा कलंक आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे कराराने कथित हिंदुत्ववाद्याचे डोके भडकावले. जे राजकारण भोंगे व अयोध्येच्या निमित्ताने सुरू झाले आहे. ते १९०५ पासून सुरू आहे. राजकारणाची भाषा तिच आहे. साधने मात्र वेगळे आहेत. हिंदू राष्ट्राची कल्पना १९०५ मध्ये मांडण्यात आली ती अमलात आणण्याचे प्रयत्न आहे. सध्या बाबरी मशीद कोणी पाडली, यात स्पर्धा लागली आहे. परंतु, या विषयावर कोणी बोलायला तयार नाहीत हे महाराष्ट्राची दुर्दव्य आहे. आमचे खरे की त्यांचे खरे हिंदुत्व हे सांगण्याची स्पर्धा घातक असल्याचे आमदार पाटील म्हणाले. प्रास्ताविक सचिन मालेगावकर यांनी मानले. महेंद्र नाकील, ॲड. तानाजी जायभावे हे व्यासपीठावर होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT