<div class="paragraphs"><p>Rohini Khadse, NCP</p></div>

Rohini Khadse, NCP

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याने राजकारणाचा स्तर घसरला?

Sampat Devgire

कैलास शिंदे

जळगाव : नवीन वर्षाचा २०२२ ला प्रारंभ झाला आहे, नवीन वर्षात नवीन संकल्प असतात. राजकारणातही सर्वसामान्य जनतेची नवीन वर्षात तीच अपेक्षा आहे. मावळत्या वर्षाचा विचार करता, मुक्ताईनगर येथील रोहिणी खडसेंवरील (Rohini Khadse) हल्ल्याच्या घटनांमुळे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील राजकारणाचा स्तर खालावल्याचे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यातील राजकारण्यांनी वाद टाळून विकासाची जी परंपरा जोपासली ती राज्यातही आदर्श ठरली आहेत, त्यामुळे कै. मधुकरराव चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, (कै.) जे. टी. महाजन, माजी खासदार उत्तमराव पाटील, यांच्या कार्यांची आणि त्यांच्या राजकीय आदर्शांची आजही आठवण केली जाते. मावळत्या वर्षात चाळीसगाव येथे राजकारणात स्पर्धा असली तरी त्यातून नेत्यामध्ये विकासाची स्पर्धा दिसून आली हे अत्यंत चांगले लक्षण आहे, आणि याच पद्धतीने पुढेही राजकारण चालण्याची गरज आहे.

राजकारण म्हटले म्हणजे पक्षीय वाद असतातच आणि ते असलेच पाहिजे परंतु त्यांचा स्तर केवळ राजकारणापुरता मर्यादित असला पाहिजे. परंतु मुक्ताईनगर येथील राजकीय वाद त्याही पलीकडे गेल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार शिवसेनेचे चंद्रकांत पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय वाद गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यांचे एकमेकांवर शाब्दिक वाद अनेक वेळा झाले आहेत, दोन्ही नेते वेगळ्या पक्षाचे असल्यामुळे हे वाद होतातच त्यात काही वावगे नाही, मात्र या वादातून आता थेट हल्ले होत असतील ते अत्यंत निषेधार्ह आहे, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

जिल्ह्याला लागत असलेले राजकीय वळण चुकीचे आहे. या हल्ल्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे हा राजकीय हेतूने घडवून आणलेला म्हटले जात आहे. याबाबत आता पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून जे काय आहे. ते निष्पन्न होईलच. परंतु या हल्ल्याचा सर्वच राजकीय क्षेत्रात निषेध करण्यात आला आहे. अगदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही निषेध केला आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात असा प्रकारे हल्ला होणे चुकीचेच आहे. त्यातही महिलेवर हल्ला होणे हेतर लाच्छंनास्पद आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला ही काळीमा आहे. राजकारणात वाद जरूर असावेत परंतु अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी सर्वच पक्षांनी काळजी घेतली पाहिजे. अशा प्रवृत्ती असल्यास त्यांना वेळीच पायबंद घातला पाहिजे.

जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वादाने हल्ला करण्याची राजकारणाने खालची पातळी गाठली असताना चाळीसगाव येथे मात्र विकासाच्या राजकारणाची आणि चांगल्या कामाची स्पर्धा असल्याचे दिसून आले आहे. चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील व चाळीससगाव येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यात अंतर्गत वाद आहेत, कधी कधी ते बाहेरही दिसून आले आहेत. परंतु त्यांच्यात सद्या सुरू असलेली विकास कामांची आणि सामाजिक कामांची स्पर्धा लक्षात घेण्यासारखी आहे, दोन्ही नेत्यांनी चाळीसगाव शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करून त्यांचे शानदार अनावरण केले. त्यानंतर खासदार उन्मेष पाटील पाटील यांनी गिरणा नदीला प्रवाहित करण्यासाठी तसेच नदीवर बलून बंधारे बाधून शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी गिरणा भ्रमंतीचा शुभारंभ केला,तर आमदार चव्हाण यांनी तालुक्यातील महिलांसाठी ‘माहेरवाशीण’हा उपक्रम राबविला. या माध्यमातून त्यांनी महिलांचा सन्मान केला. दोन्ही नेत्त्यांच्या या उपक्रमशील कार्यक्रमामुळे विकास आणि सामाजिक हितासाठी खऱ्या अर्थाने स्पर्धा असल्याचे दिसून आले. राजकीय वाद व हल्ले करण्यापेक्षा अशा उपक्रमातून जर स्पर्धा केली तर खऱ्या अर्थाने जनतेचा फायदा होईल.

त्यामुळे राजकारणही खऱ्या अर्थाने सत्कारणी लागले त्यामुळे ‘चाळीसगाव’हा दोन्ही नेत्यांचा उपक्रम भविष्यात जिल्ह्यातील विकासाच्या राजकारणाचा ‘चाळीसगाव पॅटर्न’ ठरावा हीच अपेक्षा.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT