Sambhaji Brigade delegation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sambhaji Brigade Politics: संभाजी ब्रिगेडचे आव्हान, संस्कृती रक्षकांना राज्यघटना मान्य आहे की नाही?

Sampat Devgire

Sambhaji Brigade News: संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन नुकतेच नवी मुंबई येथे झाले. या अधिवेशनात झालेल्या भाषणांवरून वाद निर्माण झाला आहे. आता हा वाद राजकीय स्तरावर चर्चेत आला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनातील भाषणांवरून हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला होता. या संदर्भात नुकताच नाशिक शहरातील पंचवटी काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथे धरणे आंदोलन झाले. त्यात याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधीतांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

या आंदोलनाला आता संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि संभाजी ब्रिगेडमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

या संदर्भात नुकतेच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत लोकशाहीला विरोध करणाऱ्या आणि तथाकथित संस्कृती रक्षक कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

अशाप्रकारे आंदोलन करून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टिका ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यातून अंधश्रद्धा निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे राज्यात उपलब्ध असलेल्या कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

विशेषत: दूरचित्रवाहिन्यांवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांमध्ये महिलांविषयी चुकीचे चित्रण केले जाते. असे गैरप्रकार सामान्य असल्याचे दाखविले जाते. त्याविषयी समाजात अधिक जागृती करून समाजाविषयी गैरसमज होऊ नये, ही आपली भूमिका आहे.

संस्कृतीला बाधा येईल, असे संदेश आणि वर्तन मालिकांमध्ये दाखविण्यात येते. हा प्रकार म्हणजे धर्माच्या नावाखाली महिलांचे शोषणच आहे. लोकशाही मूल्य पायदळी तुडविली जातात. त्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. मात्र काही लोक यासंदर्भात खोटी माहिती पसरवून समाज माध्यमांवर संभाजी ब्रिगेडबाबत चुकीच्या माहितीचा प्रसार करीत आहेत.

संभाजी ब्रिगेडच्या या अधिवेशनात भारतीय 'राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही'या विषयावर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने विविध वाहिन्यांवर दाखविण्यात येणाऱ्या तथाकथित कौटुंबिक मालिकांमध्ये महिलांचा पेहराव, त्यांचे विचार वागणूक या संदर्भात सुरू असलेले बटबटीत चित्रण थांबवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

या लोकशाही मूल्यांना बाधा आणण्याचे काम काही संघटना दहशतीच्या माध्यमातून करू पाहत आहेत. त्यांना आळा घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्याचा आदर झाला पाहिजे, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रवींद्र दातीर, जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश भावले, उपाध्यक्ष सुनील थोरात, महानगर प्रमुख हार्दिक निगळ यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना उपस्थित होते.

एकंदरच संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वादविवाद होण्याचे चिन्ह आहेत. यावर आता संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या विरोधकांमध्ये चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत. त्याचे प्रत्यंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील मागणीतून जाणवते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT