<div class="paragraphs"><p>Burning Garbage In Dhule city</p></div>

Burning Garbage In Dhule city

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

नवीन कंत्राटदार काम सुरू करेपर्यंत नागरिकांनी मरायचे का?

Sampat Devgire

धुळे : शहरातील कचरा संकलन व अस्वच्छतेच्या प्रश्‍नावर स्थायी समिती सभेत काही नगरसेवकांनी (Corporators) नवीन कंत्राटदार काम सुरू करेपर्यंत कचरा संकलनाचे काय करणार असा प्रश्‍न केला. यावर सर्वच अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग (Garbage) कायम असून काही ठिकाणी तर कचराकुंड्यांमधील कचऱ्याला आग लावली जात असल्याने दुर्घटनेला आमंत्रण देणाऱ्या या प्रकाराला जबाबदार कोण राहील, असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

वॉटरग्रेस प्रॉडक्टस (Water Grace) या कंपनीने शहरातील कचरा संकलनाचा बोजवारा उडविल्यानंतर आता संपूर्ण कामच ठप्प झाले आहे. नवीन कंत्राटदाराला कार्यादेश देण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून करत आहे. मात्र, साधारण एक जानेवारी २०२२ पासूनच नवीन कंत्राटदार काम सुरू करेल असे दिसते. त्यामुळे सर्वच अधिकारी हे एकच उत्तर घेऊन बसलेले आहेत. दुसरीकडे तोपर्यंत काय या प्रश्‍नावर कुणीही बोलायला तयार नाही, अशी स्थिती आहे. सोमवारी स्थायी समिती सभेत नगरसेवक अमीन पटेल, अमोल मासुळे यांनी नवीन कंत्राटदार काम सुरू करेपर्यंत शहरातील कचरा संकलन, अस्वच्छतेचे काय, असा प्रश्‍न केला. त्यावर एकाही अधिकाऱ्याने सरळ उत्तर देण्याचे धाडस दाखविले नाही.

तोपर्यंत मरायचे का?

शहरात आजच कचऱ्याची समस्या गंभीर स्थितीत आहे. नवीन कंत्राटदार काम सुरू करेपर्यंत नागरिकांनी मरायचे का, असा संतप्त सवाल नगरसेवक श्री. पटेल यांनी केला. तशाच भावना श्री. मासुळे यांच्याही होत्या. घंटागाड्यांना डिझेल मिळत नसल्याचे कारण अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनीही हेच उत्तर पुढे करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे नगरसेवकांनी कोणताही प्रश्‍न केला की श्री. कापडणीस कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत विचारणा करताना दिसले. उपायुक्त शिल्पा नाईक यांनी एक पर्याय सांगितला, मात्र तोही उपयोगी ठरणार नसल्याचे सांगण्यात आले. नगरसेवक श्री. पटेल यांनी रोखीने पैसे द्या कुणीही काम करायला तयार होईल, पैसेच देणार नाही तर काम कसे होईल, असा प्रश्‍न केला. हा गोंधळ नंतर वाढतच गेला. मात्र, शेवटपर्यंत काहीही ठोस उत्तर मिळाले नाही. शेवटी सदस्य संतापल्याचे पाहायला मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही टोलवाटोलवी सर्वकाही सांगून गेल्याचे दिसले.

आगीच्या कचराकुंड्या

शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागल्याने अनेक ठिकाणी कचरा जाळला जात आहे. काही कचराकुंड्यांमधील कचऱयालाही आग लावल्याने या कचराकुंड्या आगीच्याकुंड्या झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळही कचराकुंडीतील कचऱ्याला आग लावल्याने धुरासह तेथे आग धुमसते आहे. जवळच इलेक्ट्रिक डीपी आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, बाजारपेठेत असे प्रकार होत असताना महापालिका सुस्त आहे. अशा प्रकारांमुळे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सामान्य नागरिकांचा प्रश्‍न आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT