Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar News : पवारांनी शिंदे गटातील आमदार खासदारांची डोकेदुखी वाढवली; स्पष्टच सांगितले...

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : सीमाप्रश्नासंबंधी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत कोर्टात आपल्या राज्याची बाजू नीट मांडण्यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. येत्या १५ दिवसांत ही केस सुरू झाली आणि ती अंतिम निर्णयापर्यंत आली तर ही आपल्या सर्वांसाठी समाधानाची बाब असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

पवार आज (ता. 8) कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयावर भाष्य केले. यावेळी पवार म्हणाले, अंतिम निर्णय घेयचा असेल तर सीमावासियांचे म्हणणे त्याठिकाणी योग्य पद्धतीने मांडले गेले पाहिजे, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. ज्येष्ट वकिल हरिश साळवे यांची नेमणूक या केससाठी करावी, त्यासाठी प्रयत्न करावे असेही या बैठकीत ठरवण्यात आले.

तसेच शिवसेनेवर (Shivsena) बोलताना पवार म्हणाले, मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात फिरलो आहे. शिवसेनेत दोन गट पडले हे खरे आहे. मात्र, कडवा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच (Uddhav Thackeray) आहे. उद्या निवडणुका झाल्या की समाजाच्या त्यांच्याबद्दल भावना निश्चितच कळून येतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांच्या या विधानामुळे शिंदे गटातील आमदार, खासदारांची डोकेदुखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. सत्ता हातात असल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते. पण मी आता बघतो की, सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची विधान याला तुरुंगात टाकेल, यांचा जामीन रद्द करेल वगैरे-वगैरे अशी भाषा करत आहेत. हे खरे राजकीय लोकांचे काम नाही. परंतु या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबात बोलताना पवार म्हणाले, महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावे यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले. महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते. ते सतत चुकीची वक्तव्ये करतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगले नाही. शेवटी हे महत्त्वाचे पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT