Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शरद पवारांनी सांगितली आठवण...म्हणाले संरक्षणमंत्री झाल्यावर थेट कोल्हापूर गाठले!

Sampat Devgire

नाशिक : संरक्षणमंत्री झाल्यावर शरद पवार (Sharad Pawar directly gone to Kolhapur after sworn in as Defencs Minister) यांनी सर्व प्रथम काय केले? याची आठवण (Sharad Pawar recall a incidece on Wednesday) त्यांनी बुधवारी सांगितली. ते म्हणाले, देशाचे संरक्षणमंत्रिपद मिळाल्यावर मी तातडीने दिल्लीहून मुंबई अन् मुंबईहून थेट कोल्हापूर गाठले. जनरल थोरात यांच्याकडून सात तास संरक्षणविषयक माहिती समजून घेतली.

ते म्हणाले, ज्ञानी माणसांकडून जाणून घ्यायला मला अडचण वाटत नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी काल हे उदाहरण त्यांनी तरुण पिढीपुढे ठेवले. महाराष्ट्रात (कै) आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांना संधी मिळाली. त्यांच्या रूपाने नेतृत्वाची फळी नव्या पिढीला दिलेल्या संधीतून उभी राहिली, याचा दाखला त्यांनी दिला.

‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचा प्रारंभ करताना ते ऑनलाइन बोलत होते. यावेळी ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या अनुषंगाने माजी आमदार हेमंत टकले यांनी श्री. पवार यांची मुलाखत घेतली. श्री. पवार म्हणाले, तरुण पिढीने पटकन यश मिळवण्याची घाई करू नये. त्याऐवजी जमिनीवर पाय ठेवून लोकांमध्ये मिसळावे, त्यासाठी कष्ट घ्यावेत. जाणकारांशी सुसंवाद साधावा. सतत वाचन करावे. त्यातून स्वतःचे नेतृत्व स्वतःच्या पायावर उभे करावे.

ते म्हणाले, पुस्तकांप्रमाणे माणसं वाचायला मिळतात. माणसं शिकवतात. त्यातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगून श्री. पवार म्हणाले, की कसमादे, नाशिक, पुणे, अमरावती, अकोला अशा राज्याच्या विविध भागांमध्ये मराठी भाषेत फरक आहे. त्या भागातील लोकांमध्ये मिसळल्याने भाषेशी समरस होत आनंद मिळाला. त्यामुळे ज्या भागात संवाद साधायचा तिथले शब्द वापरल्याने समाज घटकांशी नाते जुळले गेले. तरुण पिढीबरोबर संघटनात्मक काम करत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीने प्रवास केला. संघटनेतील सहकाऱ्याच्या घरी मुक्काम केला. त्यामुळे कौटुंबिक सलोखा निर्माण झाला. प्रश्‍न समजले. शेती, शिक्षण, उद्योग-धंद्यातील घटकांशी संवाद साधता आला.

क्रिकेट म्हणजे भारत

वयाच्या ८१ व्या वर्षीदेखील तरुणांशी संवाद साधण्याची इच्छा श्री. पवार यांच्या संवादातून डोकावत होती. खेळाबद्दल असलेल्या आवड आणि आस्थाविषयी ते म्हणाले, की कबड्डी, खो-खो आणि पुढे क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद मिळाले. क्रिकेटविषयक आस्था आहे. तसेच सासरे खेळाडू असल्याने ज्येष्ठ क्रिकेटपटूंना त्यांच्या कुटुंबातील आहे, असे माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद मिळाल्यावर खेळाडूंच्या प्रश्‍नांमध्ये लक्ष द्यायला सुरवात केली. खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी गुंतवणूक सुरू केली. अन्य राज्यांना सुधारणा पाहिल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद माझ्याकडे दिले गेले. त्या वेळी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या तुलनेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिजला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या संघटनेत फारसे स्थान नव्हते. त्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी माझे नाव पाकिस्तानने सुचवले. त्यास बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिजने पाठिंबा दिला. निवडणूक होणार म्हटल्यावर ऑस्ट्रेलिया, इंग्लंडने माघार घेतली आणि मला बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर राबवलेल्या उपक्रमातून क्रिकेट म्हणजे, भारत असे समीकरण तयार झाले. क्रिकेट स्पर्धांमधून खेळण्यासाठी जगातील खेळाडू भारतात यायला लागले. त्यातून संघटनेला मिळालेल्या पैशांमधून निवृत्त क्रिकेटपटूंना संधी मिळत गेली. ज्येष्ठांना पेन्शन सुरू केली. त्यातून क्रिकेट क्षेत्रात चैतन्य सळसळू लागले.

ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार, शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी यांनी उपक्रमांविषयी माहिती दिली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT