Ambadas Danve Rahul Gandhi Gen Z dialogue : राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून टीका होत असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी शिर्डी दौऱ्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते असून त्यांनी Gen-Zशी संवाद साधून देशातील तरुणांचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर आणल्याचा दावा दानवे यांनी केला.
“राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे (BJP) नागपूरमधील नेतेही नाहीत. भाजपने त्यांना पुढे केल्यामुळे ते नेते आहेत,” अशी टीका दानवे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी Gen-Zशी साधलेला संवाद हा सकारात्मक विषय असून, त्यांनी तरुणांचा मुद्दा देशपातळीवर नेल्याचे दानवे म्हणाले. “राहुल गांधी यांनी Gen-Zशी संवाद साधला. त्यांचा उद्देश निश्चित आहे. त्यांनी केले म्हणून आमची संघटना करेल, असे नाही. राहुल गांधी यांनी प्रतिगामी विचारसरणीपेक्षा महिलांशी पुरोगामी आणि विज्ञानवादी दृष्टिकोनातून संवाद साधला,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलेल्या संवादावरही दानवे यांनी टीका केली. “मी कसा मुख्यमंत्री झालो, हे सांगत बसले. तुम्ही मुख्यमंत्री झालात; पण महाराष्ट्राला दरिद्री केले, त्याचे काय?” असा सवाल त्यांनी केला.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरूनही दानवे यांनी सरकारला लक्ष्य केले. अमरावतीतील शासकीय रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अमरावती येथे शासकीय रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू झाला. त्याचे काय? आरोग्य यंत्रणा काय करतेय? झोपा काढते आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही दानवे यांनी टोला लगावला. “एकनाथ शिंदे इकडे चाकणमधील रस्त्यांचे खड्डे मोजत आहेत. खड्डे मोजण्याचेच काम राहिले आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधींच्या Gen-Z संवादामुळे देशात सकारात्मक चर्चेला सुरुवात झाली असून, त्यातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. त्यांच्या मते, फडणवीस यांचा संवाद एका मर्यादित राजकीय-सामाजिक संदर्भात राहिला, तर राहुल गांधी यांनी Gen-Zचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर नेला.
राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी तरुणी पुढे येत असल्याचा उल्लेख करत दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधींना प्रतिक्रिया देणाऱ्या मुलींना विरोध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते मुलींच्या वसतिगृहात गेले आणि त्यांना धमकावले.
“मुली-महिलांविषयी भाजपला काहीच वाटत नाही. यांच्या दहशतीमुळे मुलींना चेहरा दाखवण्याची भीती वाटू लागली आहे,” असा आरोप दानवे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या 12 वर्षांच्या काळात समाजात अशी भीती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.