Crime News
Crime News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बलात्कार करून मुलीचा खून : मृतदेह ४२ दिवसांपासून खड्ड्यात मिठात ठेवला; न्यायासाठी कुटुंबांचा टाहो

सरकारनामा ब्यूरो

नंदूरबार : आपल्या मुलीवर बलात्कार (Rape) करून तिचा खून (murder) करण्यात आला आहे. मात्र, पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला लटकविण्यात आला. बलात्कार होऊनही पोलिसांनी (Police) आत्महत्येचा गुन्हा नोंदविला आहे. शवविच्छेदन करतानाही अत्याचाराबाबत काहीच तपासणी करण्यात आली नाही. असा आरोप करत पोलिसांच्या असहकार्यामुळे हतबल झालेल्या पित्याने मुलीवर अंत्यसंस्कार न करताना मृतदेह एक-दोन नव्हे; तर तब्बल ४२ दिवस मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला आहे. पुन्हा शवविच्छेदन करून आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी या अभागी पित्यासह गावकऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या (chief Minister) कानावर ही गोष्ट घालूनही अद्याप त्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. (Shocking : Rape and murder of girl; Body was kept under a heap of salt for 42 days)

अंगावर शहारे आणणारी ही दुर्दैवी घटना नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथे घडली आहे. खडक्या येथील विवाहित मुलीला तालुक्यातीलच वावी येथील रहिवाशी रणजित ठाकरे आणि अन्य एकाने १ ऑगस्ट रोजी जबदरस्तीने गाडीवर बसवून गावाबाहेर घेऊन गेले. रणजित ठाकरे याच्यासह चार जण आपल्यावर अत्याचार करत आहेत, ते मला मारून टाकतील, अशी भीती तिने एका नातलगास फोन करून सांगितली होती. काही वेळानंतर त्या मुलीने वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांना फोन आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह झाडावरून उतरवून घेतला होता. पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.

तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगूनही शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. तिला फाशी दिली गेली असून पोलिसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला आहे, असा आरोप तिच्या वडिलांसह कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, शवविच्छदेन अहवालानंतर पोलिसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला. या प्रकरणात संशयित रणजीत ठाकरे याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली असतानाही पोलिसांच्या भूमिकेमुळे मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार न करता घराशेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातच मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांनी ठेवला आहे. या घटनेला आता तब्बल ४२ दिवस झाले आहेत. आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी आर्त हाक ते कुटुंबीय देत आहे.

या ४२ दिवसात तिच्या वडिलांसह ग्रामस्थांनी धडगाव पोलिस ठाण्यासह थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून आपलं गाऱ्हाणं मांडलं आहे. ठाणे येथील सामाजीक कार्यकर्त्या परिणीती पोंक्षेंच्या मदतीने संबंधित मुलीवर अंतिम संस्कार झाले नसल्याची बाब थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावरही घातली आहे. मुलीच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार पोलिस प्रशासनाने तहसीलदार अथवा न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीने तिचे पुनर्शवविच्छेदन करणे गरजेचे होते.

दरम्यान पोलिसांनी याबाबत बोलताना तपासाच्या अनुषंगाने जे तथ्य समोर आले, त्यानुसार अतिरीक्त कलमांचा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले. पोलिस अधीक्षकांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात पुनर्शवविच्छेदन करण्याची सूचना त्यांनी धडगाव पोलिस ठाण्याला दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तालुका दंडाधिकारी यांना पत्र लिहून पुनर्शवविच्छेदनाची मागणी केली आहे.

त्या मुलीची व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपची तपासणी करून त्यात जर तथ्य असेल तर त्याबाबत पोलिसांनी ठोस पावले उचलणे गरजेचे होते. तसेच, तिच्या आत्महत्या झालेल्या फोटोमधून देखील काही तांत्रीक बाबी उपस्थित करत आत्महत्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्या मुलीच्या कुटुंबाची पुनर्शवविच्छेदनाची मागणीची दखल प्रशासन कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT