Chhagan Bhujbal, Manoj Jarange-Patil News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : मराठा आरक्षणाविरोधातलं वक्तव्य भुजबळांना खोलात ढकलणार; 'या' कट्टर समर्थकानेही सोडली साथ

Deepak Kulkarni

Nashik News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आता मराठा आरक्षणाविरोधी वक्तव्य भोवलं आहे. मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही; पण ओबीसी प्रवर्गात मराठ्यांना आरक्षण नको, अशी त्यांची भावना जिल्ह्यातील नेत्यांना आवडलेली नाही. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या शाब्दिक चकमकी झडल्या होत्या. यानंतर आता भुजबळांच्या कट्टर समर्थकाने त्यांची साथ सोेडली आहे.

परिणामी, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांच्यापाठोपाठ मनमाड बाजार समितीचे विद्यमान सभापती तथा माजी आमदार संजय पवार यांनीही छगन भुजबळांची(Chhagan Bhujbal) साथ सोडली आहे. येवल्या व नांदगाव मतदारसंघातील दोन खंदे नेते सोडून गेल्याने मंत्री भुजबळांचा राजकीय प्रवास अधिक खडतर होत असल्याचे दिसून येते.

((राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मंत्री भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री झाले. अनपेक्षितरित्या मिळालेली सत्ता आणि त्यासोबतचे मंत्रिपद यामुळे अडीच वर्षांच्या या कार्यकाळात भुजबळांनी जिल्ह्यावरील आपली राजकीय पकड अधिक मजबूत केली. तेव्हाही अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदच मिळाले होते. परंतु, पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर त्यांनी आपली हुकमत गाजवली.

याच निधी वाटपावरून नांदगावचे आमदार सुहास कांदे(Suhas Kande) यांनी भुजबळांना थेट आव्हान दिले होते. हा विषय थेट न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्याचा निर्णय होण्यापूर्वीच राज्यात सत्तांतर झाले आणि भुजबळांपूर्वी आमदार कांदे हे सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे आमदार कांदेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यताही बळावली होती. पण कालांतराने अजित पवार गटानेही सत्तेची वाट निवडल्यानंतर कांदेंचे मंत्रिपदाचे स्वप्नं हवेतच विरले.

मात्र, दोघांमधील द्वंद्व आजही कायम असल्याचे दिसून येते. बाजार समितीच्या निवडणुकीत भुजबळांनी स्वतंत्र पॅनेल निर्माण करून आमदार कांदेंना आव्हान दिले. विशेष म्हणजे नांदगाव मतदारसंघाचे पाच माजी आमदार विरुद्ध विद्यमान आमदार अशी लढत रंगली होती. यात मनमाड बाजार समितीमध्ये १५ पैकी १२ जागा जिंकत भुजबळ गटाने आमदारांना पराभवाची धूळ चारली.

बाजार समितीचा कारभार चालू झाला. विजयात सिंहाचा वाटा उचलणारे माजी आमदार संजय पवार यांना सभापतिपद देण्यात आले. पहिल्याच सर्वसाधारण सभेपासून भुजबळांच्या निकटवर्तीयांनी संजय पवारांवर आपली हुकमत गाजवण्यास प्रारंभ केला. निवडणुकीनंतर तिसरीच सर्वसाधारण सभा पार पडण्यापूर्वीच भुजबळ समर्थकांच्या कुरबुरी सुरू झाल्या. त्या थेट भुजबळांपर्यंत पोहोचल्या आणि यातूनच संजय पवार यांची नाराजी पुढे आली. त्यातच भुजबळ सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत असल्याने मतदारसंघात नकारात्मक चित्र निर्माण झाले. (Maratha Reservation)

भुजबळांना ‘जय महाराष्ट्र’ करून...

स्थानिक पातळीवरील नेत्यांनी आपापसात भांडण करून निवडणुका लढवायच्या. दुसरीकडे मात्र याच नेत्यांनी सत्तेत सहभागी व्हायचे, या राजकारणाचा बळी ठरण्यापेक्षा भुजबळांना ‘जय महाराष्ट्र’ करून संजय पवार बाहेर पडले. पवारांची ही नाराजी ओळखून आमदार कांदेंनी त्यांना जवळ केल्याचे बोलले जाते. अर्थात, पवारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी आमदार कांदे यांच्यासोबतच ते जातील, अशी अटकळ आता बांधली जात आहे.

त्यामुळे भुजबळ समर्थक नेत्यांची पाटी नांदगावमध्ये कोरी झाल्याचे दिसून येते. कार्यकर्त्यांचा गोतावळा अजून शिल्लक आहे. अशीच काहीशी परिस्थिती येवला मतदारसंघात दिसून येते. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समितीचा उल्लेख होतो. लासलगावचा तालुका निफाड असला तरी मतदारसंघ येवला असल्याने येथील सभापती निवडण्यात भुजबळांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

ब्राह्मण समाजाचे भुजबळांविरोधात आंदोलन...

बाजार समितीच्या निवडणुकीनंतर माजी सभापती जयदत्त होळकरांनाही भुजबळांनी बाजूला सारल्यामुळे त्यांची नाराजी असणे स्वाभाविक होते. त्यांनीही मराठा आरक्षणाचा धागा पकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन भुजबळांची साथ सोडली. भुजबळांची भूमिका पटली नाही हा धागा सर्वसामान्य जनतेला न पटण्यासारखा असला तरी त्याला राजकीय रंग आता हळूहळू येऊ लागला आहे.

यापूर्वीची ब्राह्मण समाजाने भुजबळांच्या विरोधात आंदोलन केले. आता मराठा समाज अधिक आक्रमक झालेला दिसतो. अशा सलग घडणाऱ्या घटनांनी भुजबळांची मतदारांमधील प्रतिमा अधिक मलिन होत आहे. त्याला सावरण्याऐवजी त्याला दुजोरा देण्याची भूमिका भुजबळांसाठी भविष्यात अधिक अडचणीची ठरू शकते.

एक पवार आले तर दुसऱ्यांचे काय?

नांदगावचे माजी आमदार संजय पवार (Sanjay Pawar) हे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यासोबत गेल्यास पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांचे काय? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. राजेंद्र पवारांनी नागापूर ग्रामपंचायतीची निवडणूक संजय पवार गटाच्या विरोधात लढवली होती. दोघा भावांमध्ये फार सौख्य नसल्यानेच राजकीय वाटा वेगवेगळ्या होत्या. आता एक पवार आले तर दुसऱ्या पवारांचे काय होईल, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT