Vasant Gite News: विधानसभा निवडणुकीच्या पराभवावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काल चिंतन केले. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी सहकारी पक्षांवर दोषारोपण केले.
विधानसभा निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारी यावरून सर्वाधिक वाद आणि प्रतिष्ठेचा प्रश्न काँग्रेसच्या इच्छुकांनी केला होता. त्यावरून निवडणूक प्रचार सुरू झाल्यावर देखील हे नेते नाराजी व्यक्त करीत होते. त्यांची समजूत घालण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाला प्रचंड परिश्रम घ्यावे लागले होते.
प्रत्यक्ष निवडणूक प्रचार सुरू झाल्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काँग्रेसच्या नाराज इच्छुकांचे मन वळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि वेळ वाया गेला, असे चित्र पुढे आले आहे. या संदर्भात शिवसेना पक्ष कार्यालयात मंगळवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये उमेदवारांनी देखील आपले अनुभव व्यक्त केले.
यावेळी अनेक पदाधिकारी अतिशय आक्रमक झाले होते. त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय नव्हते. या पक्षाचे बहुतांशी कार्यकर्ते असहकार्य करीत होते. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचा अनुभव व्यक्त केला.
महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत संयुक्तपणे सामोरी गेली. यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते अतिशय मनापासून प्रचारात उतरले होते. नियोजनापासून तर विविध जबाबदाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीला चांगले यश आले.
लोकसभा निवडणुकीतील यशाचा विपरीत परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर झाला, असे दिसून आले. नाशिक शहरात काँग्रेसचे अनेक इच्छुक उमेदवार होते. हे उमेदवार कोणत्याही परिस्थितीत अपक्ष उमेदवारी करणार, असे देखील सांगत होते. त्यांची समजूत घालण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागले.
नाराज व इच्छुकांची समजूत घालण्यासाठी केलेल्या परिश्रमानंतर हे इच्छुक उमेदवार आणि महत्त्वाचे पदाधिकारी कुठेही प्रचारात दिसले नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याबाबत संताप आहे. आता काँग्रेस बरोबर जाण्याचा फेरविचार करण्याचा टोकाचा विचार देखील व्यक्त होऊ लागला आहे., तसेकाही कार्यकर्त्यांनी या बैठकीनंतर सांगितले.
शिवसेनेच्या बैठकीतील रोष प्रामुख्याने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर होता. या पक्षाच्या इच्छुक आणि अन्य महत्वाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या विषयी रोष असल्याचे जाणवले. अनेक माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात देखील सक्रिय दिसले.
त्यामुळे काँग्रेसचे हे वर्तन आगामी काळात शिवसेना आणि अन्य सहकारी पक्षांसाठी वादाचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी देखील होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. असे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीतून स्पष्ट झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.