Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : सुजय विखेंनी शक्यता व्यक्त केलेल्या राजकीय भूकंपाचे केंद्र नगर जिल्ह्यात की...?

सरकारनामा ब्यूरो

Sujay Vikhe-Patil : महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढणार तर नाही ना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

खासदार सुजय विखे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे भाष्य केलं. सुजय विखे म्हणाले, ''काँग्रेसमध्ये येणाऱ्या काळात भूकंप होणार आहे. कारण काँग्रेसचे ठरावीक लोकं हे मलिदा खात आहेत. शिवसेनेच्या आमदारांमध्ये देखील धुसफूस होती. त्याच प्रकारची अवस्था आता काँग्रेसच्या आमदारांमध्ये झालीय. त्यांचे तर स्वत:चे मंत्री देखील आमदारांची कामे करत नव्हते. येणाऱ्या काळात तुम्हीच पाहा, काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल'', असं गौप्यस्फोटच खासदार विखेंनी केला आहे.

''येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होईल. हे जनताही पाहील. ही फक्त सुरुवात असेल. काँग्रेसमधल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी सत्ता भोगली. मात्र, पक्षाला काहीच योगदान दिले नाही. काँग्रेसचे नेते हे फक्त आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत. काँग्रेसमधील नेत्यांनी फक्त स्वत:चे घर भरण्याचे काम केले. पण येणाऱ्या नव्या पिढीला वारंवार नाकारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे'', असा आरोपही खासदार विखे यांनी यावेळी केला.

''काँग्रेसमध्ये (Congress) एकच तरुण राहणार आहेत. ते म्हणजे फक्त राहुल गांधी. काँग्रेसमधून अनेक युवक बाहेर पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसची ओळख ही ज्येष्ठ नागरिकांचा पक्ष अशीच राहणार'', असा टोला लगावत विखेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.

कोणाचेही नाव न घेता विखेंचे सूचक वक्तव्य

''अनेक मित्र हे सर्व पक्षात असतात. ते आपल्या भावना व्यक्त करतात. त्यावर मार्ग दाखवला. मात्र, हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यामुळे दाखवलेला मार्ग लोक अवलंबतील, त्याचा परिणाम येणाऱ्या काळात हळूहळू दिसेल'', असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसचे कोणते नेते बाहेर पडणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तसेच सुजय विखे यांचा हा दावा खरा ठरणार की फोल ठारणार? विखेंनी शक्यता व्यक्त केलेल्या राजकीय भूकंपाचे केंद्र नगर जिल्ह्यात आहे की राज्यात इतरत्र कुठे आहे? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT